नागपूर : येथे एका रस्ते अपघातात लष्कराच्या दोन जवानांचा मृत्यू झाला आहे. तर सात जण गंभीर जखमी झाले. जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना १६ जूनच्या संध्याकाळी घडली. नागपुरातील कन्हान पुलावर बस आणि ऑटो रिक्षामध्ये धडक झाली. विघ्नेश आणि धीरज राय अशी यात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. हे लष्कराचे जवान असून, या दोघांनाही घटनेनंतर तातडीने रुग्णालयात नेण्यात आले मात्र तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुमार पी, शेखर जाधव, मुरुगन, दीन प्रधान, अरविंद आणि नगररत्नम अशी जखमी जवानांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जवान कुमार पी आणि नगररत्नम यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघांची प्रकृती गंभीर आहे. ऑटोचालक शंकर खरकबन यांची प्रकृतीही गंभीर आहे.
बस आणि ऑटोमध्ये ही धडक बसल्याचे सांगितले जात आहे. ऑटोमध्ये चालकासह एकूण ९ जण प्रवास करत होते. कन्हानजवळ लष्कराची छावणी आहे. गार्ड रेजिमेंटल ट्रेनिंग सेंटरचे १५ सैनिक कन्हान येथे दोन वेगवेगळ्या ऑटोमधून खरेदीसाठी गेले होते. परतत असताना यातील एका ऑटोची बसला धडक बसली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
अपघातानंतर स्थानिकांच्या जमावाने बसची तोडफोड केली. आणि आंदोलकांनी कन्हान पुलावरील वाहतूक बराच वेळ विस्कळीत केली. त्यामुळे जामची परिस्थिती कायम होती. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वाहतूक सुरू झाली.यापूर्वी महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात ऑटो रिक्षावर मोठा दगड पडून दोघांचा मृत्यू झाला होता. १२ जून रोजी कल्याण-अहमदनगर महामार्गावर मुसळधार पावसानंतर झालेल्या भूस्खलनामुळे हा अपघात झाला. मृतांमध्ये एक पुरुष आणि एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. याशिवाय एक महिलाही जखमी झाली आहे.