लोकसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा संपला आहे. दुसऱ्या टप्प्यात त्रिपुरातील काही जागांवर मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला. तसेच २६ निवडणूक अधिकाऱ्यांना राजकीय प्रचारात सहभाग नोंदवल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले.
आगरतला : पूर्व त्रिपुरा लोकसभा मतदारसंघातील मतदानाचा दुसरा टप्पा पूर्ण झाला असून अंतिम अहवाल येईपर्यंत राज्यात एकूण ७९.६६ टक्के मतदान झाले आहे. रात्री 8 वाजेपर्यंत पूर्व त्रिपुरा लोकसभा मतदारसंघातील एकूण १६६४ मतदान केंद्रांवर जोरदार मतदान झाले. दरम्यान काही मतदान केंद्रांवर मतदार फिरकलेच नाही किंवा तेथे कमी मतदान झाले. पूर्व त्रिपुरा लोकसभा मतदारसंघातील काही लोकांनी रस्त्यांची दुरवस्था, नोकऱ्या तसेच इतर मुद्दे उपस्थित करत मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकला.तसेच २६ निवडणूक अधिकाऱ्यांना राजकीय प्रचारात सहभाग नोंदवल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, लोकांनी मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकल्यानंतर स्थानिक प्रशासन तसेच निवडणूक अधिकाऱ्यांनीही त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचे प्रयत्न फोल ठरले. त्रिपुराचे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणाले की, पूर्व त्रिपुरामध्ये मतदान शांततेत पार पडले आणि मतदान केंद्रांवर मतदान करण्यासाठी आलेल्या मतदारांचे आभार मानले. ते म्हणाले की, पूर्व त्रिपुरा लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया पूर्णतः पार पडली आहे.
काही भागातील मतदारांनी मतदान केंद्रांवर मतदान न केलेल्या एकूण मतदारांच्या संख्येबाबत माध्यमांनी त्यांना विचारले असता, त्यांनी सांगीतले की " ४१/३ नटोंगलाल पारा जे.बी. स्कूल आणि ४४/५ संदाईमोहन पारा जे.बी. स्कूल अशी दोन मतदान केंद्रे नोंदणीकृत आहेत. येथे मतदान करण्यास पात्र मतदारांची अधिकृत संख्या अनुक्रमे ६४९ आणि १०५९ अशी आहे. दरम्यान ४१/३ नटोंगलाल पारा जे.बी. स्कूल येथील मतदान केंद्रावर फक्त दोघांनी मतदान केले असून, ४४/५ संदाईमोहन पारा जे.बी. स्कूल या मतदार केंद्रात फक्त १२ मतदारांनी आपला हक्क बजावला आहे."
दरम्यान निवडणूक आयोगाकडे काही निवडणूक अधिकाऱ्यांनी राजकीय प्रचारात सहभाग घेतल्याच्या तक्रारी आल्या होत्या. तक्रारींच्या निवारणाबाबत वरिष्ठ निवडणूक अधिकारी म्हणाले, "एकूण ९२ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्या सर्व निकाली काढण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेत २६ निवडणूक अधिकाऱ्यांना आचार नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल निलंबित करण्यात आले आहे."