मंगळवारी छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त कांकेर जिल्ह्यात सुरक्षा दलांनी २९ नक्षलवाद्यांना चकमकीत ठार केले. या घटनेत तीन जवानही जखमी झाले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांमध्ये बड्या नक्षलवादी नेत्यांचाही समावेश असण्याची शक्यता आहे.
रायपूर : लोकसभा निवडणुकीच्या २०२४ च्या पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यातून नक्षलवादाची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मंगळवारी सुरक्षा दलांनी कारवाई करत २९ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. या घटनेत तीन जवानही जखमी झाले आहेत. मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांमध्ये बड्या नक्षलवादी नेत्यांचाही समावेश असण्याची शक्यता आहे. छत्तीसगड राज्याच्या निर्मितीनंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात नक्षलवादी चकमकीत मारले गेले आहेत. उपमुख्यमंत्री विजय शर्मा, ज्यांच्याकडे गृहखात्याची जबाबदारीही आहे, त्यांनी या चकमकीला मोठे यश मानले आणि याचे श्रेय धाडसी सुरक्षा कर्मचाऱ्यांना जाते असे सांगितले. या कारवाईचे गृहमंत्री अमित शहा यांनीही कौतुक केले आहे.
मंगळवारी दुपारी, छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त कांकेर जिल्ह्यात नक्षलवाद्यांविरोधात ही कारवाई करण्यासाठी सुरक्षा दलांनी अचूक गुप्तचर माहिती आणि जबरदस्त समन्वयाचा वापर केला. बस्तर विभागाचे पोलिस महानिरीक्षक सुंदरराज पी. यांनी सांगितले की, कांकेर जिल्ह्यातील छोटाबेठिया पोलिस स्टेशन हद्दीतील हापटोला गावातील जंगलात नक्षलवाद्यांच्या उपस्थितीबद्दल भक्कम गुप्तचर माहिती मिळाली होती. यामध्ये उत्तर बस्तर विभागातील नक्षलवादी शंकर, ललिता, राजू आणि इतर माओवाद्यांची उपस्थिती आणि नेमके ठिकाण याची माहिती मिळाली. या गुप्त माहितीनंतर बीएसएफ आणि जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी) चे संयुक्त पथक छोटाबेठिया पोलीस स्टेशन परिसरात सक्रिय झाले. दोघांनीही कारवाईसाठी समन्वय साधला आणि सावध पावले टाकत जंगलाला वेढा घालून शोध मोहीम सुरू केली.
हापाटोला गावानजीकच्या जंगलात सुरक्षा यंत्रणा पोहोचल्याची जाणीव होताच नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. तो पर्यंत चारही बाजूंनी यंत्रणांनी त्यांना वेढा घातला होता. सुरक्षा यंत्रणांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या जबरदस्त गोळीबारात एक एक करून सर्व २९ नक्षलवाद्यांचा काटा काढण्यात आला. यात बीएसएफ व रिजर्व गार्डच्या जवानांनी अभूतपूर्व कामगिरी बजावली.
येथे उपस्थित नक्षलवाद्यांचे तळ पूर्णतः उद्ध्वस्त झाल्याचे सांगण्यात येत आहे. या सर्वांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून घटनास्थळावरून एके-47 रायफल, एसएलआर रायफल, इन्सास रायफल आणि ३०३ बंदुकांसह मोठा दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. या नक्षलवाद्यांमध्ये माओवाद्यांच्या उत्तर बस्तर विभागातील बड्या नेत्यांचा समावेश असल्याचे प्रथमदर्शनी दिसते. या गोळीबारात बीएसएफचे दोन निरीक्षक आणि एक डीआरजी जवान जखमी झाल्याची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली.
सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांना चारही बाजूंनी घेरले होते, त्यामुळे एका बाजूने शोध घेणाऱ्या पथकाने नक्षलवाद्यांचे काम संपवले. डीआयजी बीएसएफ आलोक सिंह म्हणाले, “बीएसएफचे हे मोठे इंटेलिजन्स बेस ऑपरेशन होते. आम्ही आणि डीआरजी टीम २ दिवस कोट्रीच्या ईस्टर्न साइड भागात ऑपरेशनमध्ये गुंतलो होतो. अबुझमद परिसर नक्षलवाद्यांचा अड्डा मानला जातो. आमची कमांडो आणि डीआरजी टीम खूप दिवसांपासून याचा सराव करत होती. आम्ही आमचे ऑपरेशनल धोरण विशिष्ट अशा छोट्या छोट्या ऑपरेशन्समध्ये बदलले. फोर्स डिफ्लेक्शन आणि मोबिलायझेशनची दिशा ठरवून गोरीला वॉरफेअर (गनिमी कावा)चा अवलंब केला. आम्हाला नक्षलवाद्यांना चकित करायचे होते, आम्ही त्यांना चकित केले आणि यश मिळाले."
ते पुढे म्हणाले, "येथे खूप डोंगर आहेत, त्यामुळे इथे ऑपरेशन राबवणे खूप आव्हानात्मक आहे." या पूर्वेकडील भागातून आपण कधी त्यांच्यावर हल्ला करू शकतो, याची कल्पनाही नक्षलवाद्यांना करता येत नव्हती. आम्ही केलेल्या हल्ल्यात नक्षलवाद्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागले, २९ नक्षलवादी मारले गेलेत अशी माहिती त्यांनी दिली.
या घटनेसह, या वर्षी आतापर्यंत सुरक्षा दलांनी कांकेरसह बस्तर विभागातील सात जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या चकमकीत ८० नक्षलवाद्यांना ठार केले आहे. या महिन्याच्या २ तारखेला विजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत १३ नक्षलवादी ठार झाले. तर २७ मार्च रोजी सहा नक्षलवादी ठार झाले होते.
उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी बस्तर पोलिसांनी केलेल्या चकमकीला नक्षलवादावरील "सर्जिकल स्ट्राइक" असे संबोधले, "नक्षलविरोधी आघाडीवर ही पहिलीच वेळ आहे जेव्हा सुरक्षा दलांनी हात-हाताच्या लढाईत पूर्णपणे वर्चस्व गाजवले. नक्षलवाद्यांना हाताळण्याची संधी मिळाली नाही." ते म्हणाले की, मंगळवारच्या कारवाईमुळे सुरक्षा दलांचे मनोबल वाढले आहे. चार महिन्यांत सुरक्षा दलांसोबत झालेल्या वेगवेगळ्या चकमकीत सुमारे ८० नक्षलवादी मारले गेले आहेत.