पणजी : राज्यात १८ ते २० दरम्यान वातावरणातील उष्णता आणि दमटपणा वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. या दरम्यान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. उत्तर कोकणाच्या काही भागात उष्णतेच्या लाटेची शक्यता असली तरी या काळात राज्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता नसल्याचेही खात्याने स्पष्ट केले आहे.खात्याच्या अंदाजानुसार राज्यात १८ एप्रिल पर्यंत राज्यातील कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता आहे. दरम्यान मंगळवारी पणजीत कमाल ३४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सामान्य कमाल तापमानात १.१ अंश सेल्सिअसने वाढले होते. तर किमान तापमान २६.४ अंश सेल्सिअस राहीले. मुरगाव येथे कमाल ३४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
उत्तर कर्नाटक आणि महाराष्ट्रातील मराठवाडा भागात तयार झालेल्या चक्री आवर्तनामुळे गोव्यात आज दि.१६ ते गुरुवार १८ एप्रिल दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
हवामान खात्याने याआधी एप्रिल ते जून दरम्यान गोव्यात शून्य ते दोन दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता व्यक्त केली होती. गोव्यासारख्या किनारी प्रदेशात कमाल तापमान ३७ अंश किंवा त्यावर गेले तर उष्णतेची लाट आल्याचे जाहीर केले जाते. याशिवाय कमाल तापमान सामान्य कमाल तापमानापेक्षा ४.५ ते ६.४ अंशाने वाढले तरी देखील उष्णतेची लाट असे संबोधले जाते.