हिंदू विवाहाबद्दल वादग्रस्त विधान; खासदार अजमल यांची माफी

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
03rd December 2022, 07:28 pm
हिंदू विवाहाबद्दल वादग्रस्त विधान; खासदार अजमल यांची माफी

नवी दिल्ली : एआययूडीएफचे अध्यक्ष आणि खासदार बद्रुद्दीन अजमल यांचे एक वादग्रस्त विधान समोर आले होते. त्यांनी हिंदू मुलींच्या लग्नाबाबत बोलताना, हिंदूंनी मुलींचे लग्न १८ ते २० वर्षात केलं पाहिजे, त्यांनी मुस्लिमांचा फॉर्म्युला पाळला पाहिजे, असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या, भाजप नेत्यांनी जोरदार टीका सुरू केली. यानंतर आता खासदार अजमल यांनी माघार घेत, शब्द मागे घेत असल्याचे म्हटले आहे.
माझ्या बोलण्याने कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माझे शब्द मागे घेतो, कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. सरकारने अल्पसंख्याकांना न्याय द्यावा आणि त्यांना शिक्षण व रोजगार द्यावा, अशी माझी इच्छा आहे, असं खासदार बद्रुद्दीन अजमल यांनी कालच्या विधानावर स्पष्टीकरण दिले आहे.
आसाममधील करीमगंज येथील एका कार्यक्रमात खासदार अजमल यांनी वादग्रस्त विधाने केली होती. ‘मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यास तिच्या लग्नाला सरकारने परवानगी दिली आहे. ते (हिंदू) लोक ४० वर्षांपर्यंत लग्न करत नाहीत. या काळात दोन-तीन बेकायदेशीर बायका ठेवतात. त्यांना मुले होऊ देत नाहीत. ते आपला खर्च वाचवतात. एकप्रकारे ते चेष्टा करतात. ४० वर्षानंतर आई-वडिलांनी लग्नासाठी प्रवृत्त केले किंवा ते कुठे अडकले तर ते लग्न करतात. पण, ४० वर्षानंतर मूल जन्माला घालायची त्यांच्यात क्षमता कुठे राहते? तेथून पुढे मूल जन्माला घालायचे आणि त्याला वाढवायचे, अशी आशा ते कसेकाय ठेवू शकतात? योग्य वयात लग्न झाल्यास सर्व गोष्टी योग्य होऊ शकतात. त्यामुळे मुस्लिमांचा हा फॉर्म्युला तुम्हीही मान्य करायला हवा. आपल्या मुलाचे लग्न २० ते २२ वर्षांत आणि मुलीचे लग्न १८ ते २० वर्षांत करावे, मग बघा तुमच्यातही अनेक मुले जन्माला येतील, असेही बद्रुद्दीन अजमल यांनी म्हटले होते.

हेही वाचा