२००९ मध्ये मडगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी सुनावणी पूर्ण झाली असून, निवाडा मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने राखीव ठेवला आहे.
पणजी : २००९ मध्ये मडगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी सुनावणी पूर्ण झाली असून, निवाडा मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने राखीव ठेवला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, १६ ऑक्टोबर २००९ रोजी दिवाळीच्या पूर्वसंध्येला मडगाव येथील ग्रेस चर्चच्या मागे बॉम्बस्फोट झाला होता. त्यात मालगोंडा पाटील आणि योगेश नाईक यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी प्रथम गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेने तपास केला होता. या वेळी शाखेने विनय तळेकर, धनंजय अश्टेकर, प्रशांत अश्टेकर, विनायक पाटील, प्रशांत जुवेकर आणि दिलीप माजगांवकर यांना अटक केली होती. त्यानंतर हे प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) वर्ग करण्यात आले. एनआयएने १७ मे २०१० रोजी विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. विशेष न्यायालयाने १३ डिसेंबर २०१३ मध्ये सर्व संशयितांना दोषमुुक्त केले होते. त्यानंतर एनआयएने ह्या निवाड्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले होते. या आव्हानाची अंतिम सुनावणी पूर्ण झाली असून, खंडपीठाने निवाडा राखून ठेवला आहे.