आमदार ॲड.फेरेरा यांचा धर्मांतरविरोधी विधेयकाला विरोध

गोव्यासारख्या शांतताप्रिय राज्यात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न म्हणून राज्य मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या धर्मांतरविरोधी विधेयकावर काँग्रेसचे हळदोणेचे आमदार ॲड. कार्लोस आल्वारेस फेरेरा यांनी तीव्र टीका केली आहे. आगामी विधानसभा अधिवेशनात हे विधेयक मांडले गेल्यास काँग्रेस त्याला ठामपणे विरोध करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
5 hours ago
आमदार ॲड.फेरेरा यांचा धर्मांतरविरोधी विधेयकाला विरोध

पणजी : गोव्यासारख्या शांतताप्रिय राज्यात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न म्हणून राज्य मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या धर्मांतरविरोधी विधेयकावर काँग्रेसचे हळदोणेचे आमदार ॲड. कार्लोस आल्वारेस फेरेरा यांनी तीव्र टीका केली आहे. आगामी विधानसभा अधिवेशनात हे विधेयक मांडले गेल्यास काँग्रेस त्याला ठामपणे विरोध करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

गोव्यात धार्मिक धर्मांतराची एकही ठोस घटना नोंदलेली नसताना अशा कायद्याची गरज काय, असा सवाल फेरेरा यांनी केला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून यापूर्वीही राज्यात धर्मांतर होत असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, धर्मांतराच्या प्रकरणांबाबत आकडेवारी मागितल्यानंतर तीन प्रकरणांचा उल्लेख करण्यात आला. त्यापैकी एका प्रकरणाचा पोलिसांनी तपास बंद केला, तर अन्य दोन प्रकरणे उच्च न्यायालयाने रद्द केली, असा दावा त्यांनी केला.

“राज्यात धर्मांतराची कोणतीही प्रकरणे नसताना हा कायदा आणण्याची गरज काय? ही विधेयकबाजी भाजपच्या कथानकाचा भाग असून, गोव्यात जातीय तणाव निर्माण करून लोकांमध्ये द्वेषाची बीजे पेरण्याचा प्रयत्न आहे,” असा आरोप फेरेरा यांनी केला.

भाजप लोकांमध्ये धार्मिक तेढ निर्माण करून त्यांना विभाजित करण्याचा प्रयत्न का करत आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. इतर राज्यांमध्ये धर्मांतराच्या आरोपांवर दाखल झालेली अनेक प्रकरणे उच्च न्यायालयांनी रद्द केल्याचेही त्यांनी नमूद केले.

गोवा हा धार्मिक सलोखा आणि शांततेसाठी ओळखला जातो. विविध धर्मांच्या लोकांनी येथे कोणत्याही भेदभावाशिवाय शांततेत वास्तव्य केले आहे. याच कारणामुळे अनेकांना गोव्यात येऊन स्थायिक व्हावेसे वाटते, असे फेरेरा म्हणाले.

“निवडणुकीच्या तोंडावर असे विभाजनकारी विधेयक आणणे म्हणजे भाजपला निवडणुकीतील परिस्थिती आपल्या विरोधात जात असल्याची जाणीव झाल्याचे स्पष्ट संकेत आहेत. त्यामुळे मतांसाठी जातीय तणाव निर्माण करण्याचे प्रयोग सुरू आहेत,” असा आरोप त्यांनी केला.

“हे विधेयक सभागृहात मांडले गेल्यास आम्ही ते हाणून पाडू. जनहिताच्या किंवा गोव्याच्या हिताच्या दृष्टीने या कायद्याची गरज नाही. गोवा नेहमी शांत राहिला आहे आणि शांतच राहिला पाहिजे. गोव्याला द्वेषाचे किंवा जातीय तणावाचे प्रयोगशाळा बनू देणार नाही,” असे फेरेरा यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा
सर्व पहा