सद्गुरू : गूढ आध्यात्मिक जगतातील अशा अनेक कथा आहेत, ज्या एखाद्या परीकथेसारख्या वाटतात - या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवू नका. ज्या गोष्टी तुमच्या अनुभवात नाहीत, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. त्याच वेळी, तुम्हाला जे माहीत आहे तेच सर्व काही आहे असेही कधी समजू नका. जीवनामध्ये यापेक्षाही बरेच काही असू शकते. मूलभूत प्रश्न हा आहे की, तुमची सध्याची आकलन क्षमता अधिक कशी विकसित करायची?
जर तुम्हाला सध्या जेवढे जीवन दिसत आहे, त्यापेक्षा अधिक जीवन पाहायचे असेल, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची जीवनऊर्जा अधिक तीव्रतेच्या पातळीवर कार्यरत असली पाहिजे. आमच्या कार्यक्रमांमध्ये शिकवल्या जाणाऱ्या क्रियांच्या माध्यमातून आम्ही हेच साध्य करण्याचा प्रयत्न करत आहोत. तीव्रता नसेल, तर तुम्ही कितीही प्रयत्न केले, तरी त्याचा काही उपयोग नाही; ते सर्व व्यर्थ जाईल. इतरांनी सांगितलेल्या गोष्टींची तुम्ही केवळ कल्पना करू लागाल आणि भ्रामक अवस्थेत जाल. म्हणूनच मी सांगतो की, या कथांवर विश्वास ठेवू नका. त्या कोणी सांगितल्या आहेत याने काही फरक पडत नाही. त्या मी सांगितल्या असोत, कृष्णाने सांगितल्या असोत, रामाने सांगितल्या असोत किंवा येशूने सांगितल्या असोत, याने काही फरक पडत नाही; या कथांवर विश्वास ठेवू नका.
जेव्हा मी म्हणतो, "विश्वास ठेवू नका," तेव्हा त्याचा अर्थ असा नाही की, मी तुम्हाला त्यावर अविश्वास दाखवायला सांगत आहे. तुम्हाला त्याबद्दल काही माहीतच नाही. मी कदाचित हजारो जन्मांपासून त्याबद्दल बोलत आलो असेन - पण तुमच्यासाठी ते अद्याप सत्य नाही. तुम्हाला त्यावर अविश्वासही ठेवायचा नाही आणि विश्वासही ठेवायचा नाही. तुम्ही फक्त एवढे म्हणायचे, "ठीक आहे, जीवनामध्ये जे काही आहे, ते मलाही पाहायचे आहे." तुम्हाला मी जे पाहिले ते पाहण्याची गरज नाही. जीवनामध्ये जे काही आहे ते मलाही पाहायचे आहे एवढेच तुम्हाला जाणवले पाहिजे. ही ओढ तुम्हाला निर्माण करावी लागेल आणि एकदा का ही ओढ निर्माण झाली, की मग पुढचा मार्ग कोणता? सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुमचे जीवन सध्या ज्या प्रकारे घडत आहे, त्यापेक्षा अधिक तीव्रतेने घडले पाहिजे.
जेव्हा मी तीव्रतेबद्दल म्हणतो, तेव्हा बहुतेक लोक फक्त धोका निर्माण झाला तरच तीव्र बनतात. समजा, तुम्ही तुमची कार ताशी १२०, १२५ मैलांच्या वेगाने चालवत आहात. तुम्ही खरोखरच खूप वेगाने जात आहात आणि अचानक तुमच्या समोर काहीतरी येते. आता संभाव्य अपघात होण्यापूर्वीचे ते शेवटचे काही क्षण - तुम्ही काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहात - एकतर ब्रेक लावण्याचा, घाईघाईने ब्रेक दाबण्याचा किंवा तुमच्या समोर असलेल्या वस्तूला टाळण्याचा. समजा तुमचा अपघात झाला नाही आणि तुम्हाला "दुसऱ्या जगात" पदोन्नती मिळाली नाही, म्हणजेच तुम्ही जिवंत आहात आणि आज इथे बसलेले आहात. तरीही ते काही क्षण तुम्ही कधीही विसरू शकणार नाही. ते क्षण इतके तीव्र होते की, तुम्ही केवळ त्यांचा विचार केला, तरी ते पुन्हा तुमच्यामध्ये पूर्णपणे जिवंत होतात.
किंवा समजा, तुम्ही एका उंच इमारतीच्या काठावर उभे आहात, अगदी खाली पडणार आहात. तुम्ही किती तीव्र बनता हे तुम्हाला लक्षात येते का? जर खाली पडण्याचा परिणामच काढून टाकला, तर खाली पडणे ही किती विलक्षण गोष्ट आहे, नाही का? जर कारच्या अपघाताचा परिणामच काढून टाकला, तर तुम्हाला दररोज अपघात घडवून घ्यावासा वाटेल. पण तुमची कार उद्ध्वस्त होते, तुमचे शरीर उद्ध्वस्त होते, म्हणून तुम्हाला ते टाळायचे असते. समजा हे परिणामच नसते, तर तुम्हाला हे सर्व सतत अनुभवायला आवडले नसते का? सर्व साहसी खेळ म्हणजे काय असे तुम्हाला वाटते? परिणामांशिवायचे अपघात... तुम्ही विमानातून उडी मारता आणि अगदी शेवटच्या क्षणी पॅराशूट उघडता. पण तुम्हाला खाली पडण्याचा अनुभव घ्यायचा असतो, कारण त्यामुळे तुम्ही अतिशय तीव्र बनता.
तर सर्वसाधारणपणे लोकांना केवळ धोक्याच्या क्षणीच तीव्रतेची जाणीव होते. पण मी आता ज्या गोष्टीबद्दल बोलत आहे, त्यासाठी पर्वतावरून उडी मारणे, कारचा अपघात घडवून आणणे किंवा असे काही वेडेपणाचे प्रकार करण्याची गरज नाही. तुम्ही फक्त इथे बसून तुमच्या तीव्रतेच्या शिखरावर असू शकता. जर तुम्ही इतके तीव्र होऊ शकलात, तर मग तुम्ही डोळे मिटले, की संपूर्ण जीवनभर ते पुन्हा उघडण्याची गरजही तुम्हाला भासणार नाही, कारण जीवन इतक्या प्रचंड तीव्रतेने घडत असेल. लोकांनी डोळे मिटून दीर्घकाळ ते उघडले नाहीत, याचा अर्थ त्यांना जीवनामध्ये रस नव्हता असे नाही; तर ते जीवनाचा सर्वोच्च तीव्रतेने अनुभव घेत होते. दुसरे काही करण्याचा विचारच त्यांच्या मनात आला नाही, एवढेच.
लोकांना वाटते की, एखादी व्यक्ती ध्यान करत आहे म्हणजे ती शीतनिद्रेमध्ये गेली आहे. शीतनिद्रा म्हणजे जीवनाची तीव्रता कमी करणे. ध्यान म्हणजे जीवनाची तीव्रता कमी करणे नव्हे. ते जीवनाला त्याच्या शिखराकडे नेण्याविषयी आहे. जर तुम्ही अशा तीव्र अवस्थेत असाल, तर फक्त बसून राहणे ही तुम्ही करू शकणारी सर्वात रोमांचक गोष्ट आहे.
शिव हजारो वर्षे अशाच प्रकारे बसले, कारण ते तीव्रतेच्या शिखरावर होते. उठून काहीतरी करावे, असा विचारच त्यांच्या मनात आला नाही. म्हणून जर तुमचा "व्होल्टेज" वाढला, तर जे काही पाहण्यासारखे आहे, ते सर्व तुम्हाला स्वाभाविकपणे दिसू लागेल. त्यांनी स्वतःचा "व्होल्टेज" इतका उंचावला होता, म्हणूनच त्यांचे तिसरे नेत्र उघडले. "तिसरे नेत्र" म्हणजे कपाळावर पडलेली एखादी भेग नव्हे. त्याचा अर्थ असा आहे की, इतरांना जे दिसत नाही, ते त्यांच्यासाठी उपलब्ध झाले. तुम्हीही तुमचा "व्होल्टेज" वाढवला, तर ते तुमच्यासाठीही उपलब्ध होईल.

- सद्गुरू, ईशा फाऊंडेशन


