प. बंगालमध्ये निवडणुकीनंतर उफाळला हिंसाचार; ४३३ जणांना अटक

२०० हून अधिक गुन्हे दाखल

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
just now
प. बंगालमध्ये निवडणुकीनंतर उफाळला हिंसाचार; ४३३ जणांना अटक

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात उसळलेल्या हिंसाचाराप्रकरणी पोलीस प्रशासनाने आता आक्रमक पाऊले उचलली आहेत. राज्याचे पोलीस महासंचालक  सिद्धनाथ गुप्ता यांनी बुधवारी माहिती दिली की, निवडणुकीनंतरच्या हिंसाचाराप्रकरणी आतापर्यंत २०० हून अधिक एफआयआर नोंदवण्यात आले असून ४३३ जणांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय, खबरदारीचा उपाय म्हणून १,१०० व्यक्तींना प्रतिबंधात्मक कोठडीत घेण्यात आले आहे.

'बुलडोझर रॅली' काढणाऱ्यांवर कडक कारवाई

कोलकात्याच्या न्यू मार्केट परिसरात भाजप समर्थकांनी बुलडोझरच्या साहाय्याने मांसविक्रीची दुकाने उद्ध्वस्त केल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. या पार्श्वभूमीवर डीजीपींनी स्पष्ट इशारा दिला आहे की, 'बुलडोझर रॅली' काढून दहशत निर्माण करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे संयुक्त नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत.

BJP supporters atop a bulldozer in New Market on Tuesday.

डीजीपींचे स्पष्टीकरण

माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांची सुरक्षा काढून घेतल्याच्या चर्चेवर डीजीपींनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, "कोणाचीही सुरक्षा पूर्णपणे काढलेली नाही. 'यलो बुक'मधील प्रोटोकॉलनुसार त्यांना मिळणारी Z+ दर्जाची सुरक्षा कायम आहे. केवळ त्याव्यतिरिक्त दिलेला अतिरिक्त ताफा काढून घेण्यात आला असून, तो सध्या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तैनात करण्यात आला आहे." १५ वर्षांनंतर तृणमूलची सत्ता गेल्यामुळे हा बदल करण्यात आल्याचे समजते.

भाजप कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी टीएमसी नेत्याला अटक

न्यू टाऊन परिसरात भाजप कार्यकर्ता मधु मंडल यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी तृणमूल काँग्रेसचे माजी पंचायत सदस्य कमल मंडल यांच्यासह चौघांना अटक करण्यात आली आहे. हे आरोपी भारत-बांगलादेश सीमेवरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या. मंडल आणि आरोपींमध्ये जुना जमीन वाद होता, जो निवडणुकीच्या निकालानंतर विकोपाला गेला. या घटनेनंतर संतप्त जमावाने कमल मंडल यांच्या घरावर हल्ला करून तोडफोड केली होती.

शांततेचे आवाहन आणि पोलिसांची भूमिका

डीजीपींनी राज्यातील जनतेला आवाहन केले आहे की, कोणीही कायदा हातात घेऊ नये. तक्रार असल्यास थेट पोलिसांशी संपर्क साधावा. ज्या प्रकरणांत औपचारिक तक्रार दाखल होणार नाही, तिथे पोलीस स्वतःहून (Suo Motu) गुन्हे दाखल करतील. सध्या नॅनूर आणि न्यू टाऊन येथे दोन मृत्यूंची नोंद झाली आहे, तर आसनसोल, कूचबिहार आणि बारूईपूर येथे अधिक घटना घडल्या आहेत. मात्र, बुधवार सकाळपासून कोणतीही नवीन अनुचित घटना घडलेली नाही.

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ५०० हून अधिक केंद्रीय दलाच्या तुकड्या सध्या बंगालमध्ये तैनात आहेत. हिंसाचाराकडे शून्य सहनशीलता दाखवण्याचे आदेश मुख्य सचिव आणि पोलीस दलाला देण्यात आले आहेत. राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढील आदेश येईपर्यंत हे दल बंगालमध्येच मुक्कामी राहणार आहे.

हेही वाचा