
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर हिंसाचाराच्या घटना सुरू आहेत. नॉर्थ २४ परगना जिल्ह्यातील संदेशखाली येथील बामनघेरी भागात बुधवारी रात्री गस्त घालणाऱ्या पोलीस आणि केंद्रीय दलाच्या पथकावर समाजकंटकांनी अचानक हल्ला केला. या हल्ल्यादरम्यान उपद्रव्यांनी केलेल्या गोळीबारात पाच सुरक्षा कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.

जखमी झालेल्यांमध्ये नाजाट पोलीस ठाण्याचे प्रभारी (ओसी), एक हवालदार, एक महिला पोलीस कर्मचारी आणि केंद्रीय सशस्त्र दलाच्या दोन जवानांचा समावेश आहे. जखमींना सुरुवातीला स्थानिक ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी कोलकात्याला पाठवण्यात आले आहे.
दुसऱ्या एका घटनेत, कोलकाता येथील न्यू मार्केट भागात जमावाने तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) पक्षाच्या कार्यालयावर बुलडोझर चालवून ते जमीनदोस्त केले. एवढेच नाही तर उपद्रव्यांनी परिसरातील काही दुकानांचेही मोठे नुकसान केले. या घटनेनंतर राजकीय वातावरण तापले आहे.

टीएमसीने या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' (X) वर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करत पक्षाने म्हटले आहे की, हाच आहे भाजपचा परिवर्तन मॉडेल. ते आता बुलडोझर घेऊन आले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून, परिसरात तणावाचे वातावरण आहे.