
पणजी : पणजीतील अटल सेतू (Panjim Atal Setu) वर आज मंगळवारी सकाळी भीषण साखळी अपघात (Accident) घडला. सहा कार एकमेकांवर आदळल्याने मोठी खळबळ उडाली. रस्त्यावर तेल सांडल्याने हा अपघात घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
अपघाताची माहिती मिळताच पर्वरी (Porvorim) येथून रुग्रवाहिका (Ambulance) तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. सुदैवाने, या अपघातात कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही. मात्र काही जणांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे.
प्राथमिक माहितीनुसार, रस्त्यावर तेल सांडल्याने घसरटपणा निर्माण झाल्याने चालकांचे वाहनांवरील नियंत्रण सुटल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी (Goa Police) घटनास्थळी धाव घेतली. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे.
दरम्यान, या घटनेमुळे अटल सेतूवर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली. नागरिकांनी वाहन चालवताना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहने नियमांचे पालन करून हाकण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.