स्फोटकांचा साठा आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई : निवडणूक आयोगाचा इशारा

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाआधी मोठी कारवाई करण्यात आली आहे. तृणमूल कॉंग्रेसशी (Trinamool Congress ) संबंधित असलेल्या व्यक्तीच्या घरातून पोलिसांनी सुमारे १०० देशी बॉम्ब जप्त केले आहेत. ही कारवाई दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील भांगार परिसरात करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, रफीकुल इस्लाम यांच्या घरावर गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकण्यात आला. या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही जप्ती अत्यंत गंभीर मानली जात आहे.
निवडणूक आयोगाची कडक भूमीका
या घटनेनंतर भारतीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) राज्यातील पोलीस यंत्रणेला कडक निर्देश दिले आहेत. कोलकाता पोलीस आयुक्त, डीसीपी, एसपी तसेच स्थानिक अधिकाऱ्यांना स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की, त्यांच्या कार्यक्षेत्रात अशा प्रकारच्या स्फोटकांचा साठा आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
संवेदनशील भागांमध्ये देखरेख वाढवण्याचे आदेश देण्यात आले असून, मतदारांना कोणत्याही भीतीशिवाय मतदान करता यावे यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत.
मतदानाचा टप्पा आणि सुरक्षा व्यवस्था
पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या २९४ जागांसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. पहिला टप्पा २३ एप्रिल रोजी पार पडला असून, दुसरा टप्पा २९ एप्रिल रोजी होणार आहे. मतमोजणी ४ मे रोजी होणार आहे. भांगार मतदारसंघातही याच टप्प्यात मतदान होणार आहे.
या पार्श्वभूमीवर स्फोटकांचा साठा सापडल्याने निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणण्याचा किंवा मतदारांना धमकावण्याचा प्रयत्न असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
१४२ मतदारसंघांसाठी कडेकोट बंदोबस्त
दुसऱ्या टप्प्यातील १४२ मतदारसंघांसाठी विशेष सुरक्षा आराखडा जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांच्या (CAPF) तुकड्या मोठ्या प्रमाणात तैनात केल्या जाणार आहेत.
प्रत्येक मतदारसंघात संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवले जाणार असून, १६० दुचाकी पथके जलद प्रतिसादासाठी तैनात राहतील. प्रत्येक दुचाकीवर दोन जवान असतील.
प्रशासन आणि पोलीस यांच्यात समन्वय, संवेदनशील भागांचे मॅपिंग आणि सर्वत्र दृश्यमान सुरक्षा उपस्थिती यावर भर देण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ‘एरिया डॉमिनेशन’ मोहिमा अधिक तीव्र केल्या जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
निवडणूक शांततेत आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन सतर्क असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.