
पणजी: तामिळनाडू आणि कर्नाटक दरम्यान तयार झालेला द्रोणीय पट्टा (Trough Line) व अन्य वातावरणीय बदलांमुळे राज्यात २० ते २३ एप्रिल दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर, २३ एप्रिल रोजी पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून, या चार दिवसांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो.
सोमवारी राज्यातील उकाडा कायम होता. पणजीतील किमान तापमानात वाढ होऊन ते २७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते, तर मुरगावमध्ये २६.७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. पुढील सहा दिवस राज्यातील किमान तापमान २४ ते २६ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. सोमवारी पणजीत ३४.२ अंश, तर मुरगावमध्ये ३३.८ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले.
२४ ते २८ एप्रिल दरम्यान राज्यातील वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी राज्यात मार्च आणि एप्रिल महिन्यात अवकाळी पावसाची मोठी नोंद झाली होती, मात्र यंदा हे प्रमाण तुलनेने कमी आहे. राज्यात १ ते २० एप्रिल या कालावधीत सरासरी केवळ १.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.