महिला आरक्षण विधेयकासाठी सर्व पक्षांनी एकत्र यावे

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे राजकीय पक्ष, नेत्यांना आवाहन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
10 mins ago
महिला आरक्षण विधेयकासाठी सर्व पक्षांनी एकत्र यावे

पणजी : संसद आणि विधानसभेत महिलांना योग्य प्रतिनिधित्व मिळावे यासाठी नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयक मंजूर होणे अावश्यक असून, यासाठी सर्व राजकीय पक्षांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
दि. १६ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले. देशाच्या लोकशाही प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा असून, महिलांना राजकीय प्रतिनिधित्व देण्यासाठी २०२३ मध्ये नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयकाचा मसुदा तयार करण्यात आला होता. आता ते मंजूर करण्याची वेळ आल्याचे त्यांनी नमूद केले.
महिलांचे सशक्तीकरण आणि निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढवणे ही काळाची गरज असल्याचे सांगत, समाजाची प्रगती ही महिलांच्या प्रगतीवर अवलंबून असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. घटनातज्ज्ञांशी विचारविनिमय करून हे विधेयक तयार करण्यात आले असून, महिलांच्या सक्षमीकरणासाठी सर्वांनी या विधेयकाला पाठिंबा द्यावा, असेही त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी आणि लोकशाहीची पायाभरणी मजबूत करण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे असल्याचेही मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.

हेही वाचा