उद्या शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मुंबई : भारतीय संगीत क्षेत्रातील एक देदीप्यमान तारा आणि अष्टपैलू गायिकेची ओळख असलेल्या आशा भोसले यांचे रविवारी वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकार आणि श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना शनिवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे भारतीय सिनेसृष्टीसह संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली असून, एका सुवर्ण युगाचा अंत झाला आहे.

आशा भोसले यांच्या निधनाच्या वृत्ताला त्यांचे चिरंजीव आनंद भोसले यांनी दुजोरा दिला. गेल्या काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती साथ देत नव्हती. शनिवारी रात्री प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना अतिदक्षता विभागात (आयसीयू) हलवण्यात आले होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सिनेसृष्टीतील मान्यवर आणि चाहत्यांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली होती. त्यांच्या पार्थिवावर उद्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

८ सप्टेंबर १९३३ रोजी सांगलीत जन्मलेल्या आशाताईंनी वयाच्या अवघ्या नवव्या वर्षापासून गायनाला सुरुवात केली होती. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या धाकट्या भगिनी असलेल्या आशा भोसले यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आवाजाने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. सुरुवातीच्या काळात त्यांनी अनेक आव्हानांचा सामना केला, मात्र आपल्या अष्टपैलू गायकीच्या जोरावर त्यांनी शास्त्रीय संगीतापासून ते पाश्चात्य ढंगाच्या गाण्यांपर्यंत सर्व काही लीलया पेलले.

आशाताईंच्या कारकिर्दीत 'उमराव जान' मधील गझल असो किंवा 'इजाजत' मधील भावपूर्ण गाणी, त्यांनी प्रत्येक शब्दाला आपल्या सुरांनी जिवंत केले. त्यांना दोनवेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने आणि सातवेळा फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 'दिल चीज क्या है' आणि 'मेरा कुछ सामान' यांसारखी गाणी आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी हजारो गाणी गायली आणि अनेक पिढ्यांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीतातील एक 'व्हर्सटाईल' आवाज कायमचा शांत झाला असून, ही पोकळी कधीही भरून न निघणारी आहे.
