एसआयटीने चौकशी करून सोडताच हर्षवर्धन खरात 'नॉट रीचेबल'; तपास यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

नाशिक: नाशिकमधील बहुचर्चित भोंदू बाबा अशोक खरात याच्या काळ्या साम्राज्याचा पर्दाफाश करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) प्रयत्नशील असतानाच, या प्रकरणाला आता एक नवे आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. शिर्डीतील जमीन फसवणूक प्रकरणात अशोक खरातची पत्नी कल्पना खरात आधीच फरार असताना, आता मुलगा हर्षवर्धन खरात यानेही पोलिसांना चकवा देत पलायन केल्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. एसआयटीने दोन दिवस कसून चौकशी केल्यानंतर हर्षवर्धनला घरी सोडले होते, मात्र त्यानंतर तो अचानक गायब झाल्याने नाशिक पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरातच्या गुन्हेगारी कारवायांचा तपास करत असताना एसआयटीचे पथक त्याच्या पत्नीला ताब्यात घेण्यासाठी गेले होते. मात्र, कल्पना खरात पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरली. त्याच वेळी पोलिसांनी हर्षवर्धन खरात याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. दोन दिवस चाललेल्या या चौकशीत हर्षवर्धनने पोलिसांच्या बहुतांश प्रश्नांना उत्तरे देण्याचे टाळले आणि तपास यंत्रणांना सहकार्य केले नाही. चौकशी पूर्ण झाल्यावर त्याला नियमानुसार घरी सोडण्यात आले होते. मात्र, घरून सोडल्यापासून हर्षवर्धनचा मोबाईल फोन बंद येत असून तो त्याच्या निवासस्थानीही मिळून आलेला नाही.

तपास यंत्रणांच्या नियमांनुसार, गंभीर गुन्ह्याची चौकशी सुरू असताना संशयिताने किंवा संबंधित व्यक्तीने शहर सोडण्यापूर्वी पोलीस अधिकाऱ्यांची परवानगी घेणे अनिवार्य असते. मात्र, हर्षवर्धनने कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेचे पालन न करता शहर सोडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. तो नेमका कुठे गेला आहे आणि त्याच्यासोबत आणखी कोण आहे, याचा शोध घेण्यासाठी आता पोलिसांची वेगवेगळी पथके रवाना झाली आहेत. अशोक खरातची पत्नी आणि आता मुलगा, दोघेही एकापाठोपाठ एक फरार झाल्यामुळे एसआयटी आणि स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सामान्य नागरिकांमधून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
/lokshahi-eng/media/media_files/2026/03/24/ashok-kharat-2026-03-24-11-37-39.jpg)
अशोक खरातच्या फसवणुकीच्या जाळ्याने केवळ नाशिकच नव्हे तर संपूर्ण राज्याला हादरवून सोडले आहे. या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत असताना, मुख्य संशयिताच्या कुटुंबातील सदस्यांचे अशा प्रकारे बेपत्ता होणे तपासात मोठे अडथळे निर्माण करणारे ठरत आहे. हर्षवर्धन खरातने चौकशी टाळण्यासाठी हे पाऊल उचलले असावे, असा पोलिसांचा कयास आहे. सध्या पोलीस तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्याचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. या पलायनामुळे खरात कुटुंबाच्या अडचणीत अधिकच वाढ झाली असून, पोलीस आता अधिक आक्रमक पवित्रा घेण्याची शक्यता आहे.
