मडगावात १८ फेब्रुवारीपासून 'विचारवेध'चा जागर

विविध विषयांवर तज्ज्ञांचे मिळणार मार्गदर्शन

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
34 mins ago
मडगावात १८ फेब्रुवारीपासून 'विचारवेध'चा जागर

मडगाव: मडगावातील प्रतिष्ठित संस्था 'गोमंत विद्या निकेतन'तर्फे आयोजित आणि 'फोमेंतो' पुरस्कृत 'विचारवेध २०२६' ही व्याख्यानमाला येत्या १८ ते २२ फेब्रुवारी या कालावधीत रंगणार आहे. यंदाच्या व्याख्यानमालेत डॉ. त्रिलोचन शास्त्री, मिलिंद थत्ते, डॉ. नंदिता डिसोझा, डॉ. रजत तालक आणि डॉ. सदानंद श्रीधर मोरे यांसारखे विविध क्षेत्रांतील दिग्गज आपले विचार मांडणार आहेत.




गोमंत विद्या निकेतनचे अध्यक्ष सलील कारे यांनी पत्रकार परिषदेत या उपक्रमाची माहिती दिली. १८ ते २२ फेब्रुवारी दरम्यान दररोज सायंकाळी ६ वाजता संस्थेच्या सभागृहात हे कार्यक्रम होतील. व्याख्यानमालेचे उद्घाटन १८ फेब्रुवारी रोजी डॉ. त्रिलोचन शास्त्री यांच्या व्याख्यानाने होईल. 'असोसिएशन फॉर डेमॉक्रॅटिक रिफॉर्म्स'चे (ADR) संस्थापक असलेले डॉ. शास्त्री 'भारत आणि जग: आपल्यासमोरील संधी' या विषयावर भाष्य करतील. १९ फेब्रुवारीला 'वयम' चळवळीचे प्रणेते मिलिंद थत्ते 'एक चळवळ - जनात आणि वनात' या विषयावर आदिवासी हक्कांबाबतचे आपले अनुभव मांडतील.



२० फेब्रुवारी रोजी 'सेथू' संस्थेच्या डॉ. नंदिता डिसोझा 'भिन्न पण उणे नाही: सामर्थ्य ओळखणे आणि मज्जावैविध्य स्वीकारणे' या विषयावर विशेष मुलांच्या संदर्भात संवाद साधतील. २१ फेब्रुवारीला सिंगापूर विद्यापीठातील 'एआय व रोबोटिक्स लॅब'चे प्रमुख डॉ. रजत तालक 'गोवा: विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे केंद्र' या विषयावर मार्गदर्शन करतील. व्याख्यानमालेचा समारोप २२ फेब्रुवारीला संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद श्रीधर मोरे यांच्या 'संत साहित्य' या विषयावरील व्याख्यानाने होईल. सामाजिक, वैज्ञानिक आणि साहित्यिक अशा विविध विषयांची मांडणी असलेल्या या उपक्रमासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. जास्तीत जास्त रसिकांनी या वैचारिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


हेही वाचा