
नाशिक : ४०० कोटी रुपयांच्या जुन्या दोन हजार रुपयांच्या नोटांनी भरलेला कंटेनर लुटल्याच्या तक्रारीमुळे महाराष्ट्र, गोवा तसेच कर्नाटक या तीनही राज्यांत खळबळ उडाली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी नाशिक पोलिसांनी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. तपासासाठी कर्नाटक पोलीसही नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. मात्र, एका बाजूला लुटीचा दावा तर दुसरीकडे कर्नाटक पोलिसांचा नकार, यामुळे हे प्रकरण आता अधिकच रहस्यमय बनले आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मूळ प्रकार १६ ऑक्टोबर २०२५ रोजी घडला. गोव्याहून कर्नाटकाच्या दिशेने जाणारा एक कंटेनर चोर्ला घाटात अडवून लुटण्यात आला, असा दावा तक्रारदार संदीप पाटील यांनी केला आहे. या कंटेनरमध्ये तब्बल ४०० कोटींच्या जुन्या नोटा होत्या. या लुटीमध्ये तुमचा हात असल्याचा संशय घेऊन आरोपींनी संदीप पाटील यांचे मुंबई-आग्रा महामार्गावरून अपहरण केले होते.
त्यांना बेदम मारहाण करत फोनवरून धमक्याही देण्यात आल्या. या त्रासाला कंटाळून पाटील यांनी पोलिसांत धाव घेतली. अखेर ९ जानेवारी रोजी ऐन महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत हा गुन्हा दाखल झाला. लुटलेली ही प्रचंड रक्कम ठाण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक किशोर सावला यांच्याशी संबंधित असल्याचा दावा पाटील यांनी एका व्हिडिओद्वारे केला आहे.
पाच जणांना अटक, एसआयटी स्थापन
या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून नाशिक ग्रामीण पोलिसांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या नेतृत्वाखाली एसआयटीची स्थापना केली आहे. पोलिसांनी आतापर्यंत बांधकाम व्यावसायिक विराट गांधी याच्यासह पाच जणांना अटक केली आहे. मात्र, मुख्य संशयित किशोर सावला तसेच अझहर हे दोघे अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
कर्नाटक पोलिसांचे परस्परविरोधी दावे
या प्रकरणाचे धागेदोरे कर्नाटकपर्यंत पोहोचल्याने बेळगाव जिल्ह्यातील खानापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बिरादार तसेच कमकेरी हे आपल्या पथकासह नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. अटकेतील संशयितांची सध्या कसून चौकशी सुरू आहे. मात्र, दुसरीकडे बेळगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. व्ही. हिरेमठ यांनी या लुटीचा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे. चोर्ला घाट परिसरात ४०० कोटींच्या कंटेनर लुटीची अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नाशिक ग्रामीण पोलिसांकडून आलेल्या पत्राला अधिकृत उत्तर दिले जाईल, असेही हिरेमठ यांनी सांगितले.
बड्या ‘साहेबा’ची चर्चा :
या कथित लुटीच्या प्रकरणात आता राजकीय ‘कनेक्शन’ची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या ४०० कोटींच्या लुटीमागे राजकीय क्षेत्रातील एका बड्या ‘साहेबा’चा हात असल्याची कुजबूज सध्या रंगली आहे. एका मोठ्या नेत्याचे नाव या प्रकरणाशी जोडले जात असल्याने प्रशासकीय वर्तुळात अस्वस्थता आहे.
काही अनुत्तरित प्रश्न
१) हे प्रकरण अत्यंत गुंतागुंतीचे असून अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत.
२) बंदी असलेल्या २ हजार रुपयांच्या नोटांचा एवढा मोठा साठा आला कुठून?
३) ही रोकड नक्की कोणाची होती आणि कुठे नेली जात होती?
४) एवढ्या मोठ्या रकमेची वाहतूक होत असताना यंत्रणांना त्याची खबर कशी लागली नाही?
५) या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे आव्हान आता एसआयटीसमोर आहे.