
पेडणे : तेमवाडा, मोरजी समुद्रकिनारी (Morjim Beach) भागात सागरी कासवाने ९९ अंडी घातली. त्यानंतर वन खात्याच्या (Forest Department) कर्मचाऱ्यांनी ही अंडी सुरक्षित ठिकाणी ठेवली.
२६ डिसेंबर रोजी सागरी कासवाने रात्री साडेनऊ वाजता ही अंडी घातली. ती अंडी वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी सुरक्षित ठिकाणी म्हणजेच हंगामी स्वरूपाची झोपडी आहे. त्या ठिकाणी आरक्षित करून ठेवली आहेत. तेमवाडा, समुद्रकिनारी भागात १९९७ सालापासून सागरी कासव संवर्धन मोहीम राबवली जाते. गेल्या वर्षी सर्वाधिक २०६ सागरी कासव अंडी घालण्यासाठी आले होते. यंदा प्रथमच डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात एका सागरी कासवाने ९९ अंडी घालून सुरूवात केली आहे. ध्वनी प्रदूषण होत असल्याने सागरी कासव येणार नाहीत. त्यात घट होईल अशी भीती पर्यावरण प्रेमी व्यक्त करीत होते. परंतु पर्यावरण प्रेमींची भीती फोल ठरवत समुद्रकिनारी भागात ध्वनी प्रदूषण होऊन ही तब्बल २०६ सागरी कासव अंडी घालण्यासाठी आले होते.
‘सायलेंट’ झोन जाहीर
सागरी कासव मोहीम मोरजी आश्वे, मांद्रे या दोन समुद्रकिनाऱ्यांवर राबवली जाते. त्यामुळे हे दोन्ही किनारे संवेदनशील जाहीर केले आहेत. या ठिकाणी रात्री दहा नंतर व त्यापूर्वी ध्वनी प्रदूषण करणाऱ्या संगीताला मुभा दिली जात नाही. मात्र, समुद्रकिनाऱ्यावर शॅक, रेस्टॉरंट, रिसॉर्ट, नाईट क्लब आहेत. आणि त्याठिकाणी संगीत रजनीचे कार्यक्रमही होत असतात. त्यामुळे ध्वनी प्रदूषण हे चालूच असते. परंतु त्याचा काहीही परिणाम या सागरी कासवांवर होत नसल्याचे गेल्या वर्षी दिसून आले होते. यंदाच्या हंगामात एका सागरी कासवाने ९९ अंडी घातली आहेत. या अंड्यांमधून ५० ते ५२ दिवसांनी पिल्ले बाहेर पडतात. आणि ती पिल्ले नंतर समुद्राच्या दिशेने जात असतात. वन खात्याचे अधिकारी पिल्लांना समुद्रात सोडण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करीत असतात.