
पणजी : मीडीएशन (मध्यस्थी) हाच न्यायदानातील एक सर्वोत्तम उपाय आहे. यामुळे दोन्ही पक्षांचे पैसे वाचतात व शिवाय सौहार्दाचे संबंधही टिकून राहतात, असे सरन्यायाधीश सूर्य कांत (Chief Justice Surya Kant) यांनी म्हटले आहे.
पणजीत मध्यस्थीच्या जागृतीसाठी काढलेल्या फेरीनंतर बोलताना सरन्यायाधीशांनी हे वक्तव्य केले. यावेळी सरन्यायाधीशांहस्ते वृक्षारोपण सुद्धा झाले. सरन्यायाधीशपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सूर्यकांत हे प्रथमच गोव्यात आले आहेत. गुरूवारी रात्री त्यांचे गोव्यात आगमन झाले.
गोवा कायदा सेवा प्राधिकरणातर्फे आज सायंकाळी पर्वरीतील उच्च न्यायालय इमारतीत अंमलीपदार्थ विरोधी जागृती मोहीमेचा शुभारंभ होत आहे. ३० दिवस ही मोहीम चालेल. सरन्यायाधीश सूर्यकांत हे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर, न्यायाधीश महेश सोनक व इतर मान्यवरांची उपस्थिती असेल.