राज्यातील सुमारे ५०० जणांना गंडा

पणजी : राज्यातील सुमारे ५०० जणांना २.९० कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हा विभागाने (ईओसी) सुभाष धुरी (४५, सिंधुदुर्ग), दिगंबर भट (४०, सावंतवाडी) आणि सारिका पिळणकर (४०, सावंतवाडी) या तिघांना अटक केली आहे.
या प्रकरणी सांतइस्तेव येथील वेनॉन डायस यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, बायो इस्टेट सोल्यूशन प्रा. लि. कंपनीसह संचालक गुलाबराव करंजुले, त्याची पत्नी अश्विनी गुलाबराव करंजुले, आनंद केवलरामानी, घनश्याम शर्मा, शकील खान आणि शिवाजी वाळके या संशयितांनी म्हापसा येथे कार्यालय उघडले. तसेच संशयितांनी तक्रारदारासह गोव्यातील सुमारे ५०० जणांना जादा मोबदला देण्याचे आमिष दाखवून संशयितांनी तोरसे - पेडणे येथील जमिनीत, कंपनीच्या निवृत्ती वेतन योजनेत, बायोकॉईन आणि इतर क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यानुसार संशयितांनी तक्रारदार व इतरांकडून २.९० कोटी रुपयांची गुंतवणूक करून घेतली. त्यानंतर ठरल्याप्रमाणे तक्रारदारांना भूखंड व इतर मोबदला न देता कार्यालय बंद करून पसार झाल्याचे तक्रारीत म्हटले. याची दखल घेऊन ईओसीचे पोलीस निरीक्षक रमेश शिरोडकर यांनी बायो इस्टेट सोल्यूशन प्रा. लि. कंपनीसह संचालक गुलाबराव करंजुले, त्याची पत्नी अश्विनी गुलाबराव करंजुले, आनंद केवलरामानी, घनश्याम शर्मा, शकील खान आणि शिवाजी वाळके यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. याच दरम्यान ईओसीने सोमवार, २२ रोजी सुभाष धुरी, दिगंबर भट आणि सारिका पिळणकर या तिघांना अटक करून कारवाई केली.