चाैघे जखमी, दोघे गंभीर : अपघातातील सर्व जखमी हातुर्ली-मयेचे
अपघातात जखमी झालेले भाविक.
...
न्यूज डेस्क। गोवन वार्ता
आंबोली : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथील विठूरायाचे दर्शन घेऊन परतणाऱ्या गोवा येथील भाविकांच्या व्हॅगन आर गाडीला आजरा तालुक्यातील घाटकरवाडी कित्तवडे येथे अपघात झाला. या अपघातात चार भाविक जखमी झाले. त्यापैकी दोघे गंभीर, तर दोघे किरकोळ जखमी झाले. जखमींना आंबोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.
हातुर्ली (मये-डिचोली) येथील भाविक सुमारे दहा ते पंधरा दिवसांपूर्वी पायीवारीने पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेले होते. रविवारी चंद्रभागेत स्नान करून श्री विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी इतर ठिकाणीही देवदर्शन घेतले. सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास हे भाविक पंढरपूरहून आपल्या गाडीने गोव्याला परत येत होते. आजरा तालुक्यातील घाटकरवाडी येथील कित्तवडे फाट्यावर त्यांच्या व्हॅगन आर कारला अपघात झाला. समोरून भरधाव येणाऱ्या गाडीचा अंदाज न आल्याने व्हॅगन आर चालकाने अचानक ब्रेक दाबला. यामुळे कार रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारात जाऊन पलटी झाली.
या अपघातात व्हॅगन आरमध्ये बसलेल्या रिमा रत्नाकर चोडणकर (५७) आणि स्नेहल शिवराम नागवेकर (६२) यांना गंभीर दुखापत झाली. दिव्या देवानंद कवठणकर (४८) आणि शिवराम नारायण नागवेकर (६७) (सर्व रा. हातुर्ली, मये, डिचोली) यांना किरकोळ दुखापत झाली. घाटकरवाडी कित्तवडे फाटा हे घटनास्थळ आंबोलीपासून सुमारे ११ किलोमीटर अंतरावर असल्याने, सर्व जखमींना ताबडतोब दुसऱ्या गाडीने आंबोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. परिस्थितीचे गांभीर्य पाहून आरोग्य अधिकारी डॉ. अदिती पाटकर आणि डॉ. महेश जाधव यांनी अपघातातील जखमींना प्रथमोपचारानंतर अधिक उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात पाठवले.