भारतीय महिलांची इंग्लंडवर ९७ धावांनी मात

स्मृती मानधानाचे शतक; श्री चरणीेचे ४ बळी : मालिकेत १-० ने घेतली आघाडी

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
29th June, 12:10 am
भारतीय महिलांची इंग्लंडवर ९७ धावांनी मात

नॉटिंघम : भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंड दौऱ्याची सुरुवात प्रभावी विजयाने केली असून पहिल्या टी-२० सामन्यात इंग्लंडवर ९७ धावांनी दणदणीत विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. स्मृती मानधाना हिने कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडत ११२ धावांचे शानदार शतक झळकावले, तर नवोदित श्री चरणीने ४ बळी घेत सामन्यात निर्णायक योगदान दिले.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. भारतीय संघाने आक्रमक सुरुवात केली. स्मृती मानधाना आणि शेफाली वर्मा या जोडीने ८.३ षटकांत ७७ धावांची भागिदारी केली. त्यानंतर शेफाली २० धावा करून एम आर्लॉटची शिकार ठरली. त्यानंतर आलेल्या हरलीन देआेलने स्मृतीला चांगली साथ दिली. दोघांनी मिळून १०६ धावांची भागिदारी केली. या दरम्याने स्मृतीने आपले शतक पूर्ण केले. स्मृती मंधानाने ६२ चेंडूत ११२ धावा केल्या. यामध्ये तिने १५ चौकार, ३ षटकार ठोकले. तर हरलीन देओलने २३ चेंडूत ४३ धावा केल्या. यात ७ चौकारांचा समावेश होता. ऋचा घोषने ३ चौकारांसह १५ धावा, अमनजोत कौर ३ आणि दीप्ती शर्मा ७ धावांवर नाबाद राहिली. भारतीय संघाने २० षटकांत ५ बाद २१० धावा केल्या आणि इंग्लंडसमोर विजयासाठी २११ धावांचे लक्ष ठेवले.
प्रत्युत्तरादाखल इंग्लंडची सुरुवात अत्यंत खराब झाली. त्यांचे पहिले दोन फलंदाज केवळ ९ या संघाच्या धावसंख्येवर तंबूत परतले. केवळ कर्णधार नेट सिव्हर-ब्रंट हिने काहीसा प्रतिकार केला. तिने ४२ चेंडूत १० चौकारांच्या मदतीने ६६ धावा केल्या. इतर काेणतीही फलंदाज तिला साथ देऊ शकली नाही. इंग्लंडचा संपूर्ण संघ १४.५ षटकांत ११३ धावांवर बाद झाला.
भारताकडून या सामन्यात पदार्पण करणारी श्री चरणी हिने ४ बळी घेतले. दीप्ती शर्मा आणि राधा यादव यांनी प्रत्येकी २, तर अमनजोत कौरने १ बळी घेतला. तिन सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे पुढचा सामना निर्णायक ठरणार आहे. स्मृती मंधाना हिच्या शतकाने भारताने एकतर्फी वर्चस्व गाजवत इंग्लंडला त्यांच्या घरच्या मैदानावर दडपून टाकले. नव्या चेहऱ्यांच्या प्रभावी कामगिरीमुळे भारताच्या विजयात नवा आत्मविश्वास दिसून आला. आता उर्वरित सामन्यांमध्ये हीच गती राखणे महत्त्वाचे ठरेल. इंग्लंड महिला संघासाठी ट्रेंट ब्रिजवर भारताविरुद्धचा पराभव हा टी-२० इतिहासातील त्यांचा सर्वात मोठा पराभव ठरला आहे. याआधी इंग्लंडचा २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९३ धावांनी पराभव झाला होता.
तर भारत महिला संघासाठी हा विजय त्यांच्या टी-२० इतिहासातील सर्वात मोठा चौथा विजय ठरला आहे. याआधी त्यांनी मलेशियावर १४२ धावांनी, यूएईवर १०४ धावांनी आणि बार्बाडोसवर १०० धावांनी भारतीय महिलांनी विजय मिळवले होते.
स्मृतीचा विक्रम
या सामन्यात कर्णधार मानधनाने ६२ चेंडूत ११२ धावा केल्या. ही धावसंख्या टी२० सामन्यात भारतीय महिला खेळाडूने आजवर केलेली सर्वाधिक धावसंख्या आहे. या खेळीत तिने १५ चौकार आणि तीन षटकार लगावले. मानधनाच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने पहिल्यांदा फलंदाजी करत ५ गडी गमावून २१० धावा उभारल्या. मानधनाचे हे १४ वे आंतरराष्ट्रीय शतक आहे. तिने यापूर्वी एकदिवसीय क्रिकेटमध्ये ११ शतक नावावर केले आहेत, हे भारतीय खेळाडूसाठी एक विक्रम आहे. तर तिच्या नावावर कसोटीत दोन शतके आहेत.
इंग्लंडविरोधात सर्वाधिक ५० हून अधिक धावा
या खेळीदरम्यान मानधनाने ५० धावांचा टप्पा ओलांडताच टी२० क्रिकेटच्या इतिहासात इंग्लंडविरोधात सर्वाधिक वेळा ५० किंवा त्याहून अधिक धावा करण्याच्या बेथ मूनीच्या विक्रमाची बरोबरी केली. ऑस्ट्रेलियाची कर्णधार बेथच्या नावावर इंग्लंडविरोधात ८ वेळा पन्नास पेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम आहे, आता मानधना देखील तिच्या बरोबरीला पोहचली आहे. या सामन्यात मानधना आणि शेफाली यांनी मिळून अजून एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. या दोघींनी ऑस्ट्रेलियन खेळाडू अॅलीसा हेली आणि बेथ मूनी यांच्या नाववर असलेला वीस ५० किंवा त्याहून अधिक धावांची भागिदारी रचण्याचा विक्रम मोडला आहे. आता हा विक्रम मानधना आणि शेफाली यांच्या नावावर आहे. त्याचबरोबर स्मृती क्रिकेटच्या तिनही प्रकारात शतक झळकवणारी पहिली भारतीय महिला खेळाडू बनली आहे.



सामन्याची क्षणचित्रे
हरमनप्रीत कौर अनुपस्थित, त्यामुळे मंधाना हिने कप्तानीची धुरा सांभाळली.
टॉस हरल्यानंतर भारताला पहिले फलंदाजीस पाचारण.
शेफाली व मंधानाने ७७ धावांची सलामी दिली.
नंतर मंधानाने झंझावाती शतक साजरे केले.
शेवटच्या काही षटकांत काही गडी गमावले, पण स्कोअर २१० पर्यंत नेण्यात यश.
इंग्लंडच्या फलंदाजांना सुरुवातीलाच भारताच्या गोलंदाजांनी झटका दिला.
नेट सिव्हर एकटी झुंज देत राहिली, पण साथ मिळाली नाही.
भारताने १५ व्या षटकात सामना संपवला.



  • भारतासाठी महत्त्वाचे मुद्दे
    स्मृती मंधानाचे नेतृत्व व दमदार प्रदर्शन
    श्री चरणीचे स्वप्नवत पदार्पण (४ बळी)
    अप्रतिम गोलंदाजी
    उत्तम फिल्डिंग आणि अचूक योजना

    इंग्लंड महिला संघाचे टी-२० मधील सर्वात मोठे पराभव
    ९७ धावांनी – भारताविरुद्ध, ट्रेंट ब्रिज, २०२५
    ९३ धावांनी – ऑस्ट्रेलियाविरुद्ध, चेल्म्सफर्ड, २०१९
    ७२ धावांनी – ऑस्ट्रेलियाविरुद्ध, अ‍ॅडलेड, २०२५
    ५७ धावांनी – ऑस्ट्रेलियाविरुद्ध, सिडनी, २०२५
    ५७ धावांनी – ऑस्ट्रेलियाविरुद्ध, ब्रेबॉर्न, २०१८

    भारत महिला संघाचे टी-२० मधील सर्वात मोठे विजय

    १४२ धावांनी – मलेशियाविरुद्ध, कुलालंपूर, २०१८
    १०४ धावांनी – यूएईविरुद्ध, सिल्हेट, २०२२
    १०० धावांनी – बार्बाडोसविरुद्ध, एडबॅस्टन, २०२२
    ९७ धावांनी – इंग्लंडविरुद्ध, ट्रेंट ब्रिज, २०२५
    ८४ धावांनी – वेस्ट इंडिजविरुद्ध, ग्रोस आयलेट, २०१९