ऋषभ पंत, केएल राहुल यांची शतके : आता मदार गोलंदाजांवर
लीड्स : टीम इंडियाने इंग्लंडला पहिल्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी विजयासाठी ३७१ धावांचे आव्हान दिले आहे. तर प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडने दिवसअखेर बिनबाद २१ धावा केल्या होत्या. पाचव्या आणि अखेरच्या दिवशी इंग्लंडला जिंकण्यासाठी ३५० धावांची आवश्यकता आहे. तर भारतासमोर इंग्लंडचे १० गडी बाद करण्याचे आव्हान असणार आहे.
भारताकडे पहिल्या डावात ६ धावांची आघाडी होती. तर ऋषभ पंत आणि केएल राहुल या जोडीने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने दुसऱ्या डावात ऑलआऊट ३६४ धावा केल्या. अशाप्रकारे भारताने इंग्लंडसमोर ३७१ धावांचे आव्हान ठेवले आहे. त्यामुळे आता भारतीय फलंदाजांनंतर गोलंदाजांवर सर्व जबाबदारी असणार आहे.
भारतीय क्रिकेट संघाने पहिल्या डावात ४७१ धावा केल्या. इंग्लंडने प्रत्युत्तरात ४६५ धावा केल्या. भारताने अशाप्रकारे ६ धावांची आघाडी मिळवली. त्यानंतर टीम इंडियाने तिसऱ्या दिवशी दुसऱ्या डावाला सुरुवात केली.पहिल्या डावात १०१ धावा करणारा यशस्वी जैस्वाल दुसर्या डावात ४ धावांवर बाद झाला. डेब्यूटंट साई सुदर्शन याने ३० धावा करून मैदानाबाहेरचा रस्ता धरला. कर्णधार शुबमन गिल यालाही पहिल्या डावाची पुनरावृत्ती करता आली नाही.शुबमन ८ धावा करून बाद झाला. त्यामुळे टीम इंडियाची ३ बाद ९२ अशी स्थिती झाली. त्यानंतर सलामीवीर केएल राहुल आणि उपकर्णधार ऋषभ पंत या जोडीने चौथ्या गड्यासाठी १९५ धावांची भागीदारी केली. ऋषभ पंत याने या या सामन्यात सलग दुसरे शतक झळकावलं. पंत ११८ धावा करुन बाद झाला. तर पहिल्या डावात ४२ धावा करुन माघारी परतलेल्या केएलने दुसऱ्या डावात शतक केले. केएलने १३७ धावा केल्या. केएल आऊट झाल्याने टीम इंडियाचा स्कोअर ५ बाद ३३३ असा होता.
मात्र इथून इंग्लंडच्या गोलंदाजांनी कमबॅक केले आणि टीम इंडियाला झटक्यावर झटके देत ऑलआऊट केले. टीम इंडियाने शेवटचे ६ गडी अवघ्या ३१ धावांच्या मोबदल्यात गमावले. त्यामुळे टीम इंडिया ४०० धावांचे आव्हान ठेवण्यात अपयशी ठरली. इंग्लंडला अशाप्रकारे ३७१ धावांचे आव्हान मिळाले. दिवसअखेर इंग्लंडने बिनबाद २१ धावा केल्या असून ते भारतापेक्षा ३५० धावांनी पिछाडीवर आहेत. पाचव्या दिवशी भारतीय गोलंदाजांसमोर इंग्लंडचे सर्व बळी घेण्याचे आव्हान असेल. सध्याची परिस्थिती पाहता या सामन्याचा निकाल लागणार एवढे निश्चित झाले आहे.
भारताच्या या नव्या संंघाने ९३ वर्षांनी एक मोठी कामगिरी नावे केली आहे. भारताने पहिल्या डावात ४७१ धावा करत इंग्लंडसमोर धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव ४६५ धावांवर सर्वबाद झाला. स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने एकट्याने इंग्लंडच्या निम्म्या संघाला पॅव्हेलियनमध्ये धाडलं. त्यानंतर, चौथ्या दिवशी भारताच्या दुसऱ्या डावात २ विक्रमी शतके पाहायला मिळाली.
केएल राहुलने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील ९वे शतक झळकावले. केएलने त्याचे शतक पूर्ण केल्यानंतर काही वेळातच, ऋषभ पंतनेही शतक झळकावून इतिहास लिहिला. कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतक झळकावणारा पंत जगातील दुसरा यष्टिरक्षक-फलंदाज बनला आहे.
भारताच्या खेळाडूंची ५ शतके
ऋषभ पंतने १३० चेंडूत १२ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील ८ वे शतक झळकावले. पंतचे शतक भारतीय कसोटी क्रिकेटच्या ९३ वर्षांच्या इतिहासातील एक मोठा मैलाचा दगड ठरला. पहिल्यांदाच भारताने एका कसोटी सामन्यात ५ शतके झळकावली आहेत. लीड्स कसोटीपूर्वी, टीम इंडियाच्या फलंदाजांनी एकाच कसोटी सामन्यात ५ शतके झळकावण्याचा मोठा पराक्रम याआधी कधीच केला नव्हता. याआधी, एका कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांनी सर्वाधिक ४ शतके केली होती. २००७ मध्ये, भारतीय फलंदाजांनी मिरपूरमध्ये बांगलादेशविरुद्ध हा पराक्रम केला होता.
पहिल्या डावात यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल आणि ऋषभ पंत यांनी शतके झळकावली. यशस्वी जैस्वालने १५९ चेंडूत १६ चौकार आणि एका षटकारासह १०१ धावांची खेळी केली. तर कर्णधार शुबमन गिलने कॅप्टन म्हणून पदार्पणाच्या सामन्यात शतक केले. त्याने २२७ चेंडूत १९ चौकार आणि एका षटकारासह १४७ धावांची सर्वात मोठी खेळी केली. तर ऋषभ पंतने १७८ चेंडूत १२ चौकार आणि ६ षटकारांसह १३४ धावांची वादळी खेळी केली.
पंतचे हे कसोटी क्रिकेटमधील ८ वे शतक आहे. विशेष म्हणजे त्याने यापैकी ६ शतके भारताबाहेर झळकावली आहेत. तर, इंग्लंडविरुद्ध ही त्याची ५ वी शतकी खेळी आहे. इंग्लंडमध्ये खेळताना त्याने यापैकी ४ शतके झळकावली आहेत. पंतच्या शतकामुळे तो विदेशी भूमीवर सर्वाधिक कसोटी शतके झळकावणाऱ्या यष्टीरक्षक फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
शतक झळकावल्यानंतर पंत काही मोठे फटके खेळल्यानंतर बाद झाला. त्याने १४० चेंडूत १५ चौकार आणि ३ षटकारांसह ११८ धावांची वादळी खेळी केली. यासह त्याने कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील एक दुर्मिळ विक्रम आपल्या नावे केला आहे.कसोटी क्रिकेटच्या इतिहासात दोन्ही डावात शतक झळकावणारा पंत फक्त जगातील दुसरा यष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी एका कसोटीत यष्टीरक्षक म्हणून दोन शतके करण्याचा विक्रम अँडी फ्लॉवर यांच्या नावावर आहे. अँडी फ्लॉवर यांनी २००१ मध्ये हरारे स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरूद्ध ही कामगिरी केली होती. अँडी फ्लॉवर यांनी पहिल्या डावात १४२ धावा आणि दुसऱ्या डावात त्यांनी १९९ धावांची खेळी करत ही कामगिरी आपल्या नावे केली होती. ऋषभ पंतने आता अँडी फ्लॉवर यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
पंतचा भीमपराक्रम
लीड्सच्या मैदानावर ऋषभ पंतने असे काही करून दाखवले आहे. जे कसोटी क्रिकेटमधील १४८ वर्षांच्या इतिहासात आशियातील कुठल्याही यष्टीरक्षक फलंदाजाला जमले नव्हते. ऋषभ पंतने या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना १७८ चेंडूंचा सामना करत १३४ धावांची खेळी केली. तर दुसऱ्या डावात त्याने ११८ धावांची खेळी केली. यासह तो कसोटी क्रिकेटमध्ये दोन्ही डावात शतके झळकावणारा आशियातील पहिलाच यष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे.
संक्षिप्त धावफलक
भारत : पहिला डाव : ४७१, दुसरा डाव : ३६४
इंग्लंड : पहिला डाव : ४६५, दुसरा डाव : बिनबाद २०
एका कसोटीत दोन्ही डावांत शतक झळकावलेले भारतीय फलंदाज:
विजय हजारे
११६ आणि १४५ विरुद्ध ऑस्ट्रेलिया, १९४७-48
सुनील गावस्कर – एकूण ३ वेळा
१२४ आणि २२० विरुद्ध वेस्ट इंडीज, १९७१
१११ आणि १३७* विरुद्ध पाकिस्तान, १९७८–७९
१०७ आणि १८२* विरुद्ध वेस्ट इंडीज, १९७८–७९
राहुल द्रविड –२ वेळा
१९० आणि १०३* विरुद्ध न्यूझीलंड, १९९९
११५ आणि १४८ विरुद्ध श्रीलंका, २००५
विराट कोहली
११५ आणि १४१ विरुद्ध ऑस्ट्रेलिया, २०१४
अजिंक्य रहाणे
१२७ आणि १००* विरुद्ध दक्षिण आफ्रिका, २०१५
रोहित शर्मा
१७६ आणि १२७ विरुद्ध दक्षिण आफ्रिका, २०१९
ऋषभ पंत
१३४ आणि ११८ विरुद्ध इंग्लंड, २०२५