१५ जूनपर्यंत नोंदणीची अंतिम मुदत : एपीएआरमध्ये होणार नोंद
पणजी : केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या क्षमतेचा विकास करण्यासाठी सुरू केलेल्या 'मिशन कर्मयोगी' उपक्रमांतर्गत, राज्य सरकारमधील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आयजीओटी-कर्मयोगी पोर्टलवर १५ जूनपर्यंत नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. या पोर्टलद्वारे कर्मचाऱ्यांना दरवर्षी किमान तीन कोर्स आणि सहा तासांचे प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक असून, याची नोंद त्यांच्या वार्षिक अप्रायझल अहवालात (एपीएआर) केली जाणार आहे.
कार्मिक विभागाच्या अवर सचिव दुर्गा किनळेकर यांनी काढलेल्या परिपत्रकानुसार, केंद्र सरकारने गतिमान प्रशासनासाठी, सेवांचे नागरिक-केंद्रित वितरण करण्यासाठी आणि क्षमता बांधणीला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय नागरी सेवा क्षमता बांधणी कार्यक्रम (एनपीसीएससीबी)- मिशन कर्मयोगी उपक्रम सुरू केला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचे ज्ञान, कौशल्य वाढवण्यासाठी तसेच त्यांना विविध प्रकारच्या शिक्षण संसाधने प्रदान करण्यासाठी आयजीओटी कर्मयोगी प्लॅटफॉर्मवर अनेक अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
सर्व कर्मचाऱ्यांनी १५ जूनपूर्वी कर्मयोगी प्लॅटफॉर्मवर नोंदणी केली आहे याची खात्री करण्याची जबाबदारी संबंधित विभाग प्रमुखांवर सोपवण्यात आली आहे. विभाग प्रमुखांना क्षमता बांधणी योजना तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, जेणेकरून कर्मचाऱ्यांनी पोर्टलवरील उपलब्ध अभ्यासक्रम पूर्ण करतील याची खात्री करता येईल. परिपत्रकात स्पष्ट केल्याप्रमाणे, सर्व राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दरवर्षी या प्लॅटफॉर्मवर किमान तीन अभ्यासक्रम आणि किमान सहा तासांचे प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे. या अभ्यासक्रमांच्या पूर्ततेची नोंद संबंधित कर्मचाऱ्याच्या वार्षिक कामगिरी मूल्यांकन अहवालात (एपीएआर) केली जाईल, असेही नमूद करण्यात आले आहे.
‘कर्मयोगी भारत’ आणि त्याचे कार्य
- कर्मयोगी भारत हे एक स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही) आहे. कंपनी कायदा २०१३ च्या कलम ८ अंतर्गत जानेवारी २०२२ मध्ये याची स्थापना करण्यात आली आहे.
- ही कंपनी १०० टक्के सरकारी मालकीची आणि 'ना नफा' तत्त्वावर नोंदणीकृत आहे. कर्मयोगी प्लॅटफॉर्मच्या व्यवस्थापनाचे काम ही कंपनी पाहते.
- या प्लॅटफॉर्मद्वारे सरकारी अधिकाऱ्यांना त्यांची क्षमता वाढवण्यासाठी कधीही, कुठेही, कोणत्याही उपकरणावरून शिक्षण घेता येते. हा प्लॅटफॉर्म मार्गदर्शन करून करिअर व्यवस्थापनातही मदत करतो.