'युववाणी' वरील कार्यक्रम, कबीर विषयावरील भाषण, प्रजासत्ताक दिनाच्या रूपकाची निर्मिती आणि राष्ट्रपती कलाम यांच्या भाषणांचे भाषांतर यांसारख्या प्रसंगातून लेखकाला आलेल्या आठवणी आणि प्राप्त झालेले कौशल्य यावर प्रकाश टाकणारा लेख.
‘युववाणी’ या युवकांच्या कार्यक्रमात मी काही कार्यक्रम सादर केले होते त्याची आठवण आहे. या आठवणी गोड असतात. कारण त्या त्या भाषणासाठी जी तयारी केली होती, त्यातील आनंद व नंतर प्रत्यक्ष ध्वनीमुद्रण व प्रसारण झाल्यानंतरचा आनंद हा काही और असतो. कुणी ऐकून आवडल्याचं सांगतो, दाद देतो तेव्हा हा आनंद द्विगुणित होतो.
मला एकदा ‘कबीर’ या विषयावर टॉक द्यायला बोलावलं होतं. मी आनंदाने तयारी केली. याचं कारण हा विषय माझ्या आत्यंतिक आवडीचा. मी अनेक पुस्तके परत वाचली. कबीराच्या शिकवणीचं सार थोडक्यात कोंकणीत मांडायचं होतं. जास्त दोहे घेतले तर तो समतोल बिघडू शकला असता. जीवन व कार्य या विषयी पाल्हाळ न लावता दोहे घेणं अनिवार्य होतं. हे सर्व वाचून काढताना एक समाधान मिळालं. कबीरचे गुरू रामानंद यांचा उल्लेख केला. आठ शब्दांतील दोह्यात ८० शब्दांचं जीवनाचं सार सांगणाऱ्या कबीर वाणीची झलक आकाशवाणीच्या ‘युववाणी’ वरून दिली. सर्व कन्टेन्ट थोडक्यात म्हणजे १२ मिनिटांत बंदिस्त करणं ही एक कौशल्यपूर्ण कसरत. ते भाषण आठवणीत राहिलं.
यशवंत म्हांबरे नावाचे एक अधिकारी आकाशवाणीवर होते. त्या काळी ते ‘युववाणी’ ही बघत होते. अचानक एक प्रोग्राम करण्याचं दिल्लीहून फर्मान आलं. विषय होता ‘प्रजासत्ताकाचं महत्त्व’ या विषयावरील एक अर्ध्या तासाचं रूपक. २६ जानेवारीला ते प्रसारित होणार होतं. एकाने ती जबाबदारी घेतली आणि ऐन वेळी घात मारला. ताबडतोब म्हांबरेंनी मला पाचारण केले. एकच दिवस होता. मी अगोदर काही युवा कलाकारांना तयार केले. नंतर मजकूर तयार करायला बसलो. संविधान रचना, प्रजासत्ताकाचं महत्त्व, बाबासाहेबांचं कार्य असा मोठा आवाका होता. ते संतुलित प्रमाणात म्हणजे ३० मिनिटात बसवायला थोडा खटाटोप करावा लागला. घाईघाईत हा अभ्यास, संशोधन, माहिती गोळा करणे, ग्रंथालयात जाऊन पुस्तकातून संदर्भ घेणे हे पूर्ण केले. कार्यक्रम व्यवस्थित झाला. जबाबदारी, कर्तव्य, प्रामाणिकपणा, शिस्त अशा गुणांच्या या स्वाध्यायाच्या अनुभवातून व्यक्तिमत्त्वाला पैलू पाडले गेले.
एपीजे अब्दुल कलाम हे राष्ट्रपती असताना त्यांची भाषणे अनुवादीत करताना शिकायला मिळालं. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांचं भाषण यायचं. हिंदी व इंग्रजी प्रती. त्यावरून कोंकणी करायचं. वेळ कमी असायचा. अचूकता व शुद्धता हे आव्हान असायचं. डॉ. कलाम यांचं भाषण जरा मोठं असायचं. ते शास्त्रज्ञ असल्याने त्यात रॉकेट प्रणाली, नॅनो तंत्रज्ञान, इग्नीशन, गणितीय परीभाषा व तत्संबंधीच्या उपमा असायच्या. तत्काळ, तत्क्षणी शब्द कॉयन करून अर्थपूर्ण पध्दतीने करणं हे खरोखरच आव्हान असे. त्यातून खूप शिकायला मिळालं. राज्यपालांची भाषणेही यायची. त्यातील परिभाषा भारतीय राज्यशास्त्रावर, संविधानावर आधारलेली असायची. ती अनुवादीत करण्याचा सराव झाला. ‘करंट अफेअर्स’, ‘स्पॉटलाईट’, ‘आज की सुर्खियाँ’ अशा दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या काही निवडक कार्यक्रमांचं कोंकणी भाषांतर करून प्रसारित करण्याचं काम ऐनवेळी यायचं. ते विलक्षण गतीने पण अचूकपणे करावं लागे. त्यातून आपली लवचिकता वाढून, कला चमकत राहते.
अनेक आठवणी आहेत. निवडणूक काळातील, खास करून संसदीय निवडणूकांच्या निकालावेळच्या. देशव्यापी ‘रेडीय ब्रीज’ कार्यक्रम दिल्लीहून चालू असायचा. गोव्यातील दोन तज्ञ आणि मी असे तिघे स्टुडिओत बसून राहायचो. वेगवेगळ्या राज्यात चालू असलेल्या मतमोजणी निकालांविषयीचे हे प्रश्न असत. दिल्ली स्टुडिओत प्रख्यात पत्रकार असत. गोव्यातील मतमोजणीचे कल पाहून हा पक्ष मागे का, निवडणुकीचे मुद्दे, रोजगार, मायनिंग व अन्य कारणांचं पृथक्करण करणारे प्रश्न ते विचारत. सजग, सचेत राहून त्यांना हिंदी आणि इंग्रजीत उत्तरे द्यावी लागत. अशा प्रकारे रेडिओने आमच्या कलेच्या वेगवेगळ्या आयामांना धार आणली.
-मुकेश थळी
(लेखक साहित्य अकादेमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक, अनुवादक, कोशकार असून आकाशवाणीचे निवृत्त वृत्तनिवेदक आहेत.)