विविध दुर्घटनांनी घेतलेले बळी

सर्व दुर्घटना तसेच इतर अपघाताची दखल घेऊन प्रशासनाने प्रतिबंधक उपाययोजना मार्गी लावण्याची गरज आहे. तसेच त्याची कडक अंमलबजावणी होण्याची आवश्यकता आहे.

Story: कॉलिंग अटेंशन |
25th May, 12:03 am
विविध दुर्घटनांनी घेतलेले बळी

राज्यात गेल्या महिनाभरात घडलेल्या विविध दुर्घटनांनी अनेकांचा बळी घेतला आहे, विशेषतः ३५ वर्षांखालील तरुण-तरुणींची संख्या यात लक्षणीय आहे. एकीकडे ही दुर्दैवी मालिका सुरू असतानाच, दुसरीकडे गेल्या चार-पाच दिवसांपासून राज्याच्या अनेक भागांत अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. सुदैवाने, या अवकाळी पावसामुळे आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, नागरिकांच्या घरांचे आणि इतर मालमत्तांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान यापुढे राज्यात पाऊस सुरु होणार आहे त्यामुळे धबधबे, नद्या, तलाव व इतर नैसर्गिक जलसाठ्याच्या ठिकाणी पर्यटक व स्थानिक भेट देणार आहेत. वरील सर्व दुर्घटना तसेच इतर अपघाताची दखल घेऊन प्रशासनाने प्रतिबंधक उपाययोजना मार्गी लावण्याची गरज आहे. तसेच त्याची कडक अंमलबजावणी होण्याची आवश्यकता आहे.

राज्यात महिन्याच्या सुरुवातीला एक धक्कादायक आणि धार्मिक उत्सवाला गालबोट लावणारी घटना घडली. लाखो भाविकांच्या श्रद्धेचे स्थान असलेल्या शिरगाव येथील देवी लईराईच्या जत्रोत्सवाला शुक्रवार २ मे रोजी दिमाखात प्रारंभ झाला. मात्र शनिवार ३ रोजी पहाटे जत्रोत्सवासाठी जमलेल्या भाविक, धोंडांमध्ये अचानकपणे चेंगराचेंगरी झाली. त्यात ६ भाविक ठार झाले तर सुमारे ७० भाविक जखमी झाले आहे. यातील तीन ते चार जणांची अजून गंभीर स्थिती असल्यामुळे त्याच्यावर बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात उपचार सुरु 

आहेत. ही घटना राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठी धक्कादायक आणि दुःखदायक घटना आहे. या घटनेची दखल घेऊन सरकारने चौकशी समिती स्थापन केली होती. 

समितीने राज्य सरकारला अहवाल सादर करून आठ अधिकाऱ्यांना चौकशीसाठी ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावल्या आहेत.

याच दरम्यान राज्यात हॉटेलच्या स्वीमिंगपूलमध्ये तसेच कालव्यात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला. याशिवाय पहिल्या आठवड्यात तर एकाच दिवशी वेगवेगळ्या अपघातात चार युवकांचा मृत्यू झाला. याशिवाय हल्लीच बिर्ला चौकातून वास्कोकडे जाणारी मिनी बस क्विनीनगर-सांकवाळ महामार्गावर उलटल्याने कंडक्टर जागीच ठार झाला. तर मंगळवार २० मे रोजी होंडा येथील ट्रान्सफॉर्मरमध्ये दुरुस्तीचे काम सुरू असताना विजेचा धक्का लागून चंद्रू उर्फ सूर्या गावकर (मोर्ले-घोडेमळ) या लाईनमनचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान शुक्रवारी सांतिनेझ येथील श्री आपटेश्वर सिद्धिविनायक देवस्थानच्या मागे असलेल्या तळीत बुडालेल्या युवकाला वाचविण्यासाठी गेलेला युवकच बुडण्याची दुर्दैवी घटना घडली. त्यात सांताक्रूझ येथील साई वैभव वायंगणकर (२७) याचा मृत्यू झाला. 

राज्यात मागील २२ दिवसात दिवसा एक या सरासरीने २२ जणांचा अपघाती मृत्यू झाला. यात ३५ वर्षांखालील तरुण-तरुणींची संख्या लक्षणीय आहे. दरम्यान राज्यात मागील चार-पाच दिवसात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. यात कोणतेही जीवितहानी झाली नाही. नागरिकांच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

पावसाळ्यात समुद्र किनारे खवळलेला असतो. त्यामुळे त्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी कमी होते. या काळात ग्रामीण भागाला पर्यटकांची पसंती असते. त्यामुळे पर्यटन दृष्टीने गोव्यातील धबधबे, खाणींचे खंदक, नद्या, तलाव व इतर जलसाठ्याच्या ठिकाणी पर्यटक व स्थानिक वारंवार भेटी देतात. त्या ठिकाणी पार्ट्या आयोजित केल्या जातात. याशिवाय काही जण त्या ठिकाणी दारू पिऊन दंगामस्ती करतात. गेल्या काही वर्षातील घटनांची दखल घेतली असता, काही ठिकाणी बुडण्याच्या घटनेत वाढ झालेली दिसते. त्यामुळे गेल्या वर्षी अश्या ठिकाणी नागरिकांना बंदी घालण्यात आली. याची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने यंदाही नैसर्गिक जलसाठ्यांमध्ये प्रवेशाला पुढील ६० दिवसांसाठी बंदी घातली आहे. या बंदीची प्रशासनाने कडक अंमलबजावणी करावी. त्यासाठी वरील ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवण्याची आवश्यकता आहे. याशिवाय त्या ठिकाणी पोलिसांची किंवा सुरक्षा रक्षक तैनात करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे निदान काही प्रमाणात अश्या प्रकारच्या घटनांना आळा बसेल.


- प्रसाद शेट काणकोणकर
(लेखक गोवन वार्ताचे वरिष्ठ प्रतिनिधी आहेत.)