केंद्रीय मंत्री निती गडकरी : जुवारी पुलावरील ट्विन टॉवर्सची पायाभरणी
पायाभरणी सोहळ्यात दीपप्रज्वलन करताना केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी. सोबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, खासदार सदानंद शेट तानावडे, मंत्री माॅविन गुदिन्हो, सुदिन ढवळीकर, सुभाष फळदेसाई, सभापती रमेश तवडकर, आमदार दिगंबर कामत व इतर. (अक्षंदा राणे)
प्रतिनिधी। गोवन वार्ता
वास्को : पत्रादेवी ओलांडल्यानंतर गोव्यातून होणारी वाहतूक कमी होण्यासाठी १२ ते १५ हजार कोटी रुपये खर्च करून गोवा बंगळुरू रिंग रोड बांधण्याचा विचार आहे. त्यासंबंधी अभ्यास सुरू आहे. हा महामार्ग तयार झाला तर गोव्यातील वाहतूक कोंडीचे प्रश्न सुटतील, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
कुठ्ठाळी येथील नवीन जुवारी पुलावरील ओब्झर्व्हेटरी टॉवर्स व व्ह्युविंग गॅलरीज प्रकल्पांच्या पायाभरणी सोहळ्यात मंत्री गडकरी बोलत होते. सदर कार्यक्रम चिखली पंचायत सभागृहात शुक्रवारी पार पडला. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, खासदार सदानंद शेट तानावडे, सभापती रमेश तवडकर, पंचायत मंत्री माॅविन गुदिन्हो, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, मंत्री सुभाष फळदेसाई, आमदार दाजी साळकर, आमदार दिगंबर कामत, आमदार आंतोनियो वाझ, आमदार वीरेश बोरकर, आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स, नगराध्यक्ष गिरीश बोरकर आदी उपस्थित होते. मंत्री नितीन गडकरी पुढे म्हणाले, मुंबई –गोवा महामार्गाच्या कामात खूप अडचणी आल्या. त्या सोडवण्यात आल्याने तीन-चार महिन्यांत हा पूर्ण महामार्ग वाहतुकीसाठी खुला होईल. यामुळे ५ ते ६ तासांत गोव्यातून मुंबई गाठणे शक्य होणार आहे.- प्रकल्पाच्या अंतर्गत सजावटीसाठी व संकल्पनासाठी गोव्यातील आर्किटेक्टांची स्पर्धा घ्या. चांगली संकल्पना असलेले आराखडे निवडा.
केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी मंत्री नितीन गडकरी यांचे साहाय्य व सहकार्य गोमंतकीय विसरणार नाहीत, असे सांगितले. विकासासाठी जे आवश्यक आहे, ते मंत्री गडकरी यांनी गोव्याला दिले आहे. या प्रकल्पामुळे पर्यटकांची संख्या वाढेल. काहीजणांना गोव्याचा विकास पाहवत नाही. त्यांच्यापासून सावध राहण्याची गरज आहे, असेही मंत्री श्रीपाद नाईक पुढे म्हणाले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले...
गोव्यातील महामार्गांची विकाकामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत.
रस्त्यांचे रुंदीकरण व दर्जेदार कामे झाल्याने वेळेची व इंधनाची बचत होत आहे.
नवीन जुवारी पुलावरील ओब्झर्व्हेटरी टॉवर्स व व्ह्युविंग गॅलरीज हा माझा ‘ड्रिम प्रोजेक्ट’ आहे. या प्रकल्पासाठी गोवा सरकारला एकही पैसा खर्च करावा लागणार नाही; मात्र जीएसटीतून कोट्यवधी रुपये मिळतील.
प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पर्यटकांची संख्या वाढणार आहे.
गोव्यात वॉटर टॅक्सीचा विचार व्हावा. जेणेकरून वाहतूक समस्या सुटेल शिवाय महसूलही वाढेल.
प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिकल वाहनांचा वापर, इथेनॉलचा वापर आवश्यक आहे.
पर्यावरणाचा विचार करून झाडे अधिक लावा.
नवीन संकल्पना घेऊन प्रयागराज येथे केबल पूल बांधण्यात येणार आहे.
प्रकल्पामुळे अर्थव्यवस्थेला ऊर्जा मिळेल : मुख्यमंत्री
प्रखर, दूरदर्शी नेतृत्व लाभल्याशिवाय जागतिक दर्जाचे प्रकल्प होऊ शकत नाहीत. आम्हाला पंतप्रधान मोदींचे प्रखर नेतृत्व आणि मंत्री नितीन गडकरी यांचे दूरदर्शी नेतृत्व लाभले आहे. मंत्री गडकरी विदेशात प्रवास करताना नवीन गोष्टी पाहतात. त्यापेक्षा अधिक चांगले प्रकल्प भारतात व्हावेत यासाठी ते प्रयत्नरत असतात. नवीन संकल्पनासाठी ते गोव्याला प्राधान्य देतात. गोव्यात आतापर्यंत ३३ हजार कोटींची कामे झाली आहेत. जुवारी पुलावरील या प्रकल्पामुळे अर्थव्यवस्थेला ऊर्जा मिळेल, रोजगार वाढेल, असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले.