मुख्यमंत्र्यांचा इशारा : साखळीत अटल आसरा योजनेच्या २७१ फाईल्स मंजूर
साखळी येथे अटल आसरा शिबिराचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. सोबत खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई, संचालक अजित पंचवाडकर व इतर.
साखळी : गोव्यातील नागरिकांना अटल आसरा योजनेचा लाभ सुरळीतपणे मिळावा यासाठी राज्यभरात शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. पावसाळ्यापूर्वी धोकादायक घरांची दुरुस्ती पूर्ण व्हावी, हा या शिबिरांचा मुख्य उद्देश आहे. या शिबिरांमध्ये ज्या लाभार्थ्यांच्या फायली पूर्णपणे मंजूर होतील, त्यांच्या बँक खात्यात ३० मे पूर्वी पैसे जमा केले जाणार आहेत. मात्र, या पैशांचा वापर केवळ घरांच्या डागडुजीसाठीच करावा, असा सक्त इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला आहे. पैशांचा गैरवापर केल्यास सरकार कठोर कारवाई करेल आणि दिलेले पैसे परत घेईल. एवढेच नाही, तर एखाद्याने जर या पैशातून गाडी खरेदी केली, तर ती गाडीही सरकार ताब्यात घेईल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी साखळी येथे आयोजित अटल आसरा शिबिरात बोलताना दिला.
साखळी रवींद्र भवनात समाज कल्याण खात्यातर्फे आयोजित अटल आसरा शिबिरात व्यासपीठावर खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई, खात्याचे संचालक अजित पंचवाडकर, उपसंचालिका मेडोरा डिकॉस्ता, मामलेदार तोरसकर बिडिओ ओमकार मांद्रेकर, साखळीचे उपनगराध्यक्ष आनंद काणेकर, नगरसेवक दयानंद बोर्येकर इतर सर्व पंचायतींचे सरपंच आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, सरकार विविध योजनांमधून लोकांच्या गरजेनुसार पैसे देते. मात्र, अनेक लोक या पैशांचा गैरवापर करतात. अटल आसरा योजना ही केवळ घरांच्या दुरुस्तीसाठी आहे. लाभार्थ्यांनी या पैशातून घराची दुरुस्ती करून त्याचे फोटो आणि कामाची बिले खात्याकडे जमा करावीत. त्यानंतरच त्यांना ७५ हजार रुपयांचा दुसरा हप्ता मिळेल. पहिल्या हप्त्याचा गैरवापर केल्यास दुसरा हप्ता मिळणार नाही आणि पहिला हप्ताही परत घेतला जाईल.
समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले, अटल आसरा ही एक अभिनव योजना आहे. मात्र, गोव्यातील लोकांना या योजनेचा पुरेसा लाभ मिळाला नाही. अनेक लाभार्थ्यांच्या फायली विविध विभागांमध्ये अडकून पडल्या होत्या. यावर उपाय म्हणून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना एकाच ठिकाणी बोलावून अर्जदारांच्या फाईल्स जलदगतीने मंजूर करण्याची योजना आखली. त्यामुळे आतापर्यंत विविध भागांमध्ये झालेल्या शिबिरांमधून सुमारे ६०० लाभार्थ्यांना लवकरच त्यांच्या खात्यात पैसे मिळणार आहेत.
साखळी मतदारसंघातील लोकांसाठी आयोजित या शिबिरात एकूण २७१ जणांच्या फायली मंजूर झाल्या. त्यामुळे २७१ लाभार्थ्यांना अटल आसरा योजनेअंतर्गत घर दुरुस्तीसाठी पैसे मिळणार आहेत.
ही योजना गरीब लोकांच्या घरांच्या दुरुस्तीसाठी आहे. जर या पैशांचा गैरवापर झाला, तर सरकार भविष्यात ही योजना बंद करू शकते. त्यामुळे खऱ्या लाभार्थ्यांना आणि गरिबांना या योजनेपासून वंचित राहावे लागेल. लोकांनी या योजनेचे पैसे केवळ घरांच्या दुरुस्तीसाठीच वापरावेत._अजित पंचवाडकर, समाज कल्याण खात्याचे संचालक