कला अकादमी येथे आयोजित गोवा काजू महोत्सवात तज्ञांचा सल्ला
काजू महोत्सवात बोलताना रोहन झांट्ये. सोबत एफडीएचे अधिकारी रिचर्ड नरोन्हा, एफएसएसआयच्या प्रिती चौधरी, दीपक परब. (समीप नार्वेकर)
पणजी : गोव्यात अजूनही निकृष्ट दर्जाचा काजू ‘गोव्याचा काजू’ म्हणून सर्रास विकला जात आहे. ग्राहकांची ही फसवणूक पूर्णपणे थांबवण्यासाठी गोव्यातील काजूंना ‘जीआय टॅग’ मिळणे आवश्यक आहे. ‘जीआय टॅगिंग’नंतर गोव्यात उत्पादित होणाऱ्या काजूची ‘ब्लॉकचेन’ प्रणाली तयार करावी, ज्यामुळे हा काजू नेमका कोणत्या बागेत पिकवला गेला आणि कोणत्या कारखान्यात त्यावर प्रक्रिया झाली याची संपूर्ण माहिती ग्राहकांना मिळू शकेल, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला.
गोवा काजू महोत्सवानिमित्त गोवा वन विकास महामंडळाने पणजीतील कला अकादमी येथे ‘काजूच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी कायदे आणि धोरणांची अंमलबजावणी’ यावर एक तांत्रिक सत्र आयोजित केले होते. यात अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी रिचर्ड नरोन्हा, झांट्ये काजूचे रोहित झांट्ये, भारतीय अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता प्राधिकरण (एफएसएसआय) पश्चिम विभागाच्या प्रादेशिक संचालक प्रीती चौधरी आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे नोडल अधिकारी दीपक परब उपस्थित होते. या सत्राचे सूत्रसंचालन रूपेश सामंत यांनी केले.
सुरुवातीला रोहित झांट्ये यांनी गोव्यातील काजू फसवणुकीच्या प्रकारांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, गोव्यात, विशेषतः किनारी भागांमध्ये अनेक ठिकाणी ‘झांट्ये काजू’ या आमच्या दुकानाच्या नावाचा गैरवापर केला जातो. पाकिटांवर ‘गोव्याचा काजू’ असे लेबल लावून निकृष्ट दर्जाचा काजू विकला जातो. अनेकदा ५०० ग्रॅमच्या पॅकेटमध्ये प्रत्यक्षात फक्त ४०० ग्रॅम काजू असतात आणि त्या पाकिटांवर किंमत तसेच इतर आवश्यक तपशीलही नमूद केलेले नसतात. या संदर्भात आम्ही अन्न आणि औषध प्रशासन, वजन आणि माप खाते आणि जीएसटी खात्याकडे अनेक तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यांनी आमच्या तक्रारींची दखल घेऊन अनेक ठिकाणी छापेही टाकले. पण हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. तसेच या फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांचे जाळे इतके मजबूत आहे की एका दुकानावर छापा टाकला, तर उर्वरित ५० दुकाने तत्काळ बंद केली जातात.
एफडीएचे रिचर्ड नरोन्हा म्हणाले, बाहेरून चांगले दिसणारे काजू दाखवून आतून खराब काजू मिसळले जातात. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी एकत्र काम करण्याची गरज आहे आणि 'जीआय टॅग' हा या समस्येवरचा उपाय आहे.
दीपक परब म्हणाले, गोव्यातील काजूंना 'जीआय टॅग' मिळवण्यासाठी सरकार केंद्राकडे प्रस्ताव पाठवणार आहे. एकदा 'जीआय टॅग' मिळाला की, कोणालाही 'गोवा काजू' हे नाव वापरता येणार नाही.
काजू उत्पादकांनी लेबलिंग आणि पॅकेजिंगच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास एफडीए कारवाईला पात्र ठरेल. गोव्यातील काजूसाठी 'जीआय' आधारित 'ब्लॉकचेन' तयार करायला हवी. त्यामुळे लेबलवरील क्यूआर कोड स्कॅन केल्यावर काजू कुठून आला हे कळेल.
- प्रीती चौधरी, प. विभागाच्या प्रादेशिक संचालक, एफएसएसआय