हल्ल्याचे टायमिंग व अनुत्तरित प्रश्न

पहलगाममधला दहशतवादी हल्ल्यामागे मोठे नियोजन आहे आणि त्याला पाक लष्कराची साथ आहे, हे उघड सत्य आहे. या हल्ल्याचे टायमिंग पाहता अनेक अनुत्तरित प्रश्न काय सांगत आहेत? हे लक्षात घेतले पाहिजे.

Story: विचारचक्र |
1 hours ago
हल्ल्याचे टायमिंग व अनुत्तरित प्रश्न

मिनी स्वित्झर्लंड समजल्या जाणाऱ्या बैसनर या पहलगामच्या भागात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछुट गोळ्या झाडल्या. निष्पाप २६ जणांचा बळी गेला. हा हल्ला झाला त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियात, तर अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स भारत दौऱ्यावर होते. म्हणजेच, एकाच दगडात अनेक पक्षी मारण्याचे टायमिंग दहशतवाद्यांनी आणि या हल्ल्याच्या क्रूर सूत्रधारांनी साधले आहे. यापूर्वीही काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी हल्ले झालेले आहेत.  मात्र, हा हल्ला अनेक अर्थाने महत्त्वाचा आहे.

या हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी तत्काळ सौदी अरेबियाचा दौरा आटोपून मायदेश गाठला. म्हणजे नियोजित गाठीभेटी आणि अनेक महत्त्वपूर्ण बाबी अपूर्ण राहिल्या. हे व्हावे हीच कदाचित हल्ल्यामागची योजना असावी. आखातातील मुस्लिम देशाचे भारताशी मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित होणे, त्यांच्याशी व्यापार, दळणवळण, संरक्षण अशा विविध क्षेत्रात सहयोग होणे हे पाकिस्तानला रुचणारे नाही. त्यात मिठाचा खडा कसा टाकता येईल, भारताचे प्रयत्न कसे विफल होतील, यात त्याला अधिक रस, तर अमेरिकन उपाध्यक्ष भारतात आले असताना हा हल्ला घडवून काश्मीरकडे संपूर्ण जगाचे लक्ष वळविणे हा सुद्धा हेतू आहे. या दोन्ही पातळ्यांवर हल्लेखोर कमालीचे यशस्वी झाले आहेत.

काश्मीरमध्ये घातपाती कारवाई होणार याचा सुगावा गुप्तहेर खात्याला लागला. त्यामुळेच पंतप्रधान मोदींचा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातील काश्मीर दौरा रद्द झाला, तर केंद्रीय गृहमंत्री आणि गृहसचिव यांनी काश्मीरचा दौरा केला. बैठक घेऊन सुरक्षेचा आढावाही घेण्यात आला. या बैठकीत मुख्यमंत्र्यांची उपस्थिती का नव्हती? बैसनर येथील हल्ला आपण का रोखू शकलो नाही? आपल्या गुप्तहेर खात्याने खरेच इशारा दिला होता का? नसेल तर का नाही? असेल तर त्याकडे दुर्लक्ष कसे झाले? आपण गाफील कसे राहिलो? ज्या भागात हा हल्ला झाला तेथे पायी किंवा घोडे किंवा खेचरांवरून जावे लागते. मग मुख्य रस्ता ते बैसनर या दरम्यान एकही भारतीय सैनिक नव्हता का? हातात अत्याधुनिक रायफल घेऊन पायी जाणारे दहशतवादी कुणालाच कसे दिसले नाहीत? उन्हाळ्यात पर्यटकांनी बहरणाऱ्या या भागात दहशतवादी अचानक कसे येऊ शकतात? अतिरेक्यांच्या रेकीचा आपल्या कुठल्याच यंत्रणेला सुगावा कसा लागला नाही? दहशतवादी त्याच परिसरात मुक्कामाला असतील तर त्याचा थांगपत्ताही आपल्याला कसा नाही? हे सारे अपयश कुणा एकाचे नक्कीच नाही. त्यास अनेक जण जबाबदार आहेत. केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक पोलीस, प्रशासन, लष्कर, गुप्तहेर खाते, निमलष्करी दल, स्थानिक नागरिक, व्यावसायिक असे सारेच.

अशा प्रकारचा हल्ला झाला, की पाकिस्तानशी दोन हात करण्याची भाषा बोलली जाते. सर्जिकल स्ट्राईकचेही धुमारे फुटतात. मुळात हल्ल्याच्या मुळाशी जाण्याचे सोडून आपण फांद्यांकडेच पाहतो. पुलवामा हल्ल्याचेच उदाहरण घेता येईल. त्या हल्ल्यासाठी जे आरडीएक्स वापरण्यात आले ते कुठल्या मार्गाने आणि कसे आले? सैनिकांची बस त्या मार्गानेच जाणार आहे याची माहिती दहशतवाद्यांना कशी अचूक मिळाली? प्रत्यक्ष हल्ला झाला तोपर्यंत आपल्या साऱ्याच यंत्रणा सूशेगात कशा होत्या? या सर्वाचा थांगपत्ता आजवर लागलेला नाही. किंबहुना त्यावर कुणीच बोलत नाही. त्याची चौकशी होत नाही की दोषींवर कारवाई सुद्धा. अशा प्रकारच्या गंभीर घटना घडूनही दोषी नामानिराळे राहत असतील तर एकप्रकारे त्यांना हे बळच आहे. देशांतर्गत घरभेदी कोण आहेत? त्यांचा शोध कोण आणि कसा घेणार?

प्रसिद्धीलोलुप वक्तव्ये करण्यापेक्षा आधी कृती हवी. प्रत्यक्षात अत्यंत अचूक माहितीचे संकलन, कसोशीचे नियोजन, काटेकोर अंमलबजावणी या त्रिसूत्रीवर भर हवा. काही महत्त्वाच्या बाबींची गांभीर्याने चर्चा होणे आवश्यक आहे.

३७० कलम हटविल्यानंतर काश्मीरमध्ये शांतता आहे, तेथे विकासाची कवाडे खुली झाली आहेत, पर्यटन व्यवसाय भरभराटीस आहे, असा प्रचार होतो आहे. ही बाब हेरूनच दहशतवाद्यांनी ऐन पर्यटन हंगामाच्या प्रारंभी हल्ला केला आहे. त्यामुळे आता पुढील काही महिने पर्यटक तेथे जाण्यास धजावणार नाहीत. पुढील महिन्यापासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेचे ज्या लाखो भाविकांनी बुकिंग केले आहे त्यांच्या पोटातही भीतीचा गोळा आला आहे. म्हणजेच, या हल्ल्यातून दहशतवाद्यांनी तेथील पर्यटनाला मोठा सुरुंग लावला आहे. याचा फटका कर रूपातून सरकारला बसेलच, पण स्थानिक नागरिकही त्यातून सुटणार नाहीत. विशेष म्हणजे इथेही मुस्लिम बांधवांचाच रोजगार हिरावला जाणार आहे. ज्या धर्मद्वेषापोटी दहशतवाद्यांनी हल्ला केला त्यातून त्यांचेच धर्मबांधव भरडले जाणार आहेत. या हल्ल्यामुळे काश्मीरमध्ये पुन्हा बेरोजगारी वाढण्याची भीती आहे. परिणामी माथेफिरू तरुणांना आपल्या गळाला लावणे दहशतवाद्यांना शक्य होणार आहे. दहशतवादी गटांकडून अतिशय नियोजनपूर्वक आणि थंड डोक्याने हल्ल्याला पूर्णत्व दिले जाते. मुंबई हल्ल्याच्या कटातील आरोपी तहव्वूर राणा याचे अमेरिकेतून भारतात यशस्वी प्रत्यार्पण झाले आहे. न्यायालयीन सुनावणीही सुरू झाली आहे. या खटल्यातून आणि त्याच्या चौकशीतून पाकचा नापाक बुरखा जगासमोर येणार आहे. त्यामुळेही पाकिस्तान व दहशतवाद्यांचा तीळपापड झाला आहे. यातूनच आक्रमक होत पहलगाममध्ये हल्ला झालेला असू शकतो. हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या नाकाबंदीसाठी भारत सरकारने पाच मोठे निर्णय घेतले आहेत. त्याचेही पडसाद उमटतीलच. मात्र, दहशतवाद्यांचे हल्ले आपण का रोखू शकत नाही? आपण कुठे कमी पडत आहोत? दहशतवाद्यांच्या काश्मीरमधील मुसक्या आवळण्यासाठी नक्की काय करायला हवे? याचा सर्वंकष विचार करायला हवा. तसेच, धार्मिक तेढ निर्माण करून भलेही नजीकचे ईप्सित साध्य होत असेल, पण दूरगामी देशाचेच नुकसान होते, हे आपण कधी समजून घेणार? ‘फोडा आणि राज्य करा’, हे ब्रिटिशांचे धोरण आपण अद्यापही का गाडू शकलेलो नाही? कुठल्याही घटना घडल्या की त्याला धार्मिक रंग देणे आणि धार्मिक भावना चेतवणे, याने देश दुभंगतो आहे, फुटीची बीजे रोवली जात आहेत, यातूनच देशाच्या अंतर्गत सुरक्षेला मोठा धोका निर्माण होतो आहे. खरे तर, अशा प्रकारच्या कुटील कारवायांवर सर्जिकल स्ट्राईक करण्याबरोबरच घातकी पाकिस्तानला व दहशतवाद्यांना धडा शिकविण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. आपण ते कसे पेलतो यावरच पुढील दहशतवादी हल्ले थांबणार का वाढणार, हे अवलंबून आहे.


भावेश ब्राह्मणकर, (लेखक संरक्षण, सामरिकशास्त्र व पर्यावरणाचे अभ्यासक व मुक्त पत्रकार आहेत.)