देवाचा आशीर्वाद आपल्या पदरात पडावा या भावनेने उद्योजक श्याम शेट्ये यांनी हा नारळ घेतला.

पेडणे : गोव्यातील ग्रामीण संस्कृतीत मंदिरांच्या कालोत्सव, जत्रोत्सव, वर्धापन दिन, स्थापना आणि तिथीवार येणाऱ्या उत्सवांना विशेष महत्त्व आहे. आपल्या ग्रामदेवता, कुलदेवतांचे आशीर्वाद घेण्यासाठी भाविकांची पावले आपसूकच गावाकडे वळतात. यावेळी अजून एक जिव्हाळ्याचा विषय म्हणजे पावणी.

देवाच्या चरणी भाविकांनी वाहिलेली फुले, फळे आणि इतर साहित्याची मंदिर समितीद्वारे सार्वजनिकरित्या बोली लावली जाते. देवाचा आशीर्वाद आपल्या पदरात पडावा या भावनेने भाविक देखील बोली लावतात. ज्याची बोली सर्वात जास्त त्याला त्या वस्तूची रक्कम अदा केल्यावर ती वस्तू दिली जाते.

दरम्यान, कोरगाव येथील श्री देव रघुगोणशेट सत्यनारायण महापुजेची पावणी नुकतीच आयोजित करण्यात आली होती. यंदा या पूजेच्या पावणीचा नारळ थोडे थोडके नव्हे, तर तब्बल १० लाख रुपयांना गेला आहे. उद्योजक श्याम शेट्ये यांनी हा नारळ घेतला. गेल्या अनेक वर्षांपासून देवाचा आशीर्वाद श्याम शेट्ये आपल्या पदरात पाडून घेत आहेत.
