आरोपपत्र दाखल केल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर होता राजीनाम्याचा दबाव
मुंबई : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात महाराष्ट्राचे मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे. धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता, त्यावरून मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
मागील काही काळापासून महाराष्ट्राच्या राजकारणात संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे मोठे वादळ उठले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी वाल्मिक कराड यांनी आत्मसमर्पण केल्याने प्रकरणाला नवे वळण मिळाले होते.
पोलिसांनी आरोपपत्र दाखल केल्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढत होता. देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हाच सूत्रधार असल्याचे पोलिसांनी आपल्या आरोपपत्रात म्हटले आहे.
वाल्मिक कराड हा मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. त्यामुळे विरोधकांनी देखील या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. अखेर आज मंगळवारी मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे.