ढिगाऱ्यात अडकलेल्या १३ जणांना वाचवण्यात यश. अन्य तिघांचा शोध सुरू.
बंगळुरू : कर्नाटकात गेल्या ३ दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्ते, मेट्रो आणि वाहतुकीची इतर साधने पावसामुळे ठप्प झाली आहेत. दर येथील पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने पावसाचे पाणी येथील वसाहतीत घुसले आहे. येथे पुरसदृश्य स्थिती निर्माण झाल्यामुळे येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
दरम्यान काल मंगळवारी बेंगळुरूमध्ये सात मजली बांधकामाधीन इमारत कोसळली. यामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली २१ जण अडकले होते, त्यापैकी १३ जणांना वाचवण्यात यश आले आहे. ३ लोक अजूनही ढिगाऱ्याखाली अडकलेत.
ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफच्या पथकाने रात्रभर बचावकार्य केले. बुधवारी सकाळी श्वानपथक पथकालाही पाचारण करण्यात आले. टीमने ढिगारा हटवण्यासाठी मोठ्या मशिन्सही मागवल्या आहेत.
काल दुपारी १ वाजता जेवण करत होतो. तेवढ्यात मोठा आवाज ऐकू आला. ही इमारत हादरायला लागली आणि काही वेळाने ती कोसळली, असे येथे काम करणाऱ्या एका मजुराने सांगितले.
या मुद्द्यावरून कर्नाटकात राजकारण सुरू झाले आहे. विरोधी पक्ष जेडीएसने काँग्रेसवर बेंगळुरूची दुर्दशा निर्माण केल्याचा आरोप केला आहे. 'दुबई आणि दिल्लीत काय चालले आहे ते तुम्ही पाहिले असेलच. देशाच्या अनेक भागांत हीच परिस्थिती आहे. आपण निसर्गाला रोखू शकत नाही, परंतु आपण व्यवस्थापन करत आहोत' असे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार म्हणाले.
उपमुख्यमंत्री म्हणाले - बेकायदेशीरपणे इमारत बांधली जात होती.
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार मंगळवारी रात्री घटनास्थळी पोहोचले. त्यांनीच २१ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती दिली. ६०/४० जागेवर बेकायदेशीरपणे इमारत बांधली जात असल्याचे त्यांनी सांगितले. दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
कर्नाटकात गेल्या ३ दिवसांपासून पाऊस :
गेल्या तीन दिवसांपासून बेंगळुरूसह कर्नाटकच्या अनेक भागांत सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. उत्तर बेंगळुरूमधील येलाहंका आणि आसपासच्या अनेक भागात पूर आला आहे. येलाहंकाचे मध्य विहार कंबरभर पाण्याने भरले आहे. मदत आणि बचाव कर्मचाऱ्यांनी बोटीच्या मदतीने लोकांना बाहेर काढले आहे.
कर्नाटकात दाना चक्रीवादळाचा प्रभाव:
अंदमान समुद्रातून उगम पावलेले चक्रीवादळ 'दाना' बंगालच्या उपसागराकडे वेगाने पुढे सरकत आहे. हे चक्रीवादळ 24 ऑक्टोबरच्या मध्यरात्री किंवा 25 ऑक्टोबरच्या सकाळी पुरीच्या किनारपट्टीवर धडकेल. त्याचा परिणाम कर्नाटकातही दिसून येत आहे. वादळ येण्याआधीच मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.