पणजी : गोवा सरकारच्या सामाजिक योजने अंतर्गत गोवा सरकारकडून गुरांच्या पालनासाठी दर दिवशी ठराविक रक्कम अनुदान म्हणून दिली जाते. दरम्यान काहीजण योजनेतून मिळणारे पैसे घेतात व गुरांना मात्र वाऱ्यावर टाकून मोकळे होता. अशी गुरे गावभर हिंडतात. त्यांचा वाहतुकीस अडथळा निर्माण होतोच पण त्यांच्यामुळे अपघातासही निमंत्रण मिळते.
अशीच घटना काल पणजीतील मधूबन सर्कल-सांतीनेज येथे घडली. एका चारचाकीच्या धडकेत गाय जायबंदी झाली. पायांना दुखापत झाल्याने तिला धड चालताही येत नाही. दरम्यान अपघात घडूनही या गायीचा मालक न आल्याने, स्थानिकांनी या गाईच्या कानातील टॅगमधून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, सदर गाय ही सिंधुदुर्गातील असून तिचा मालक हा गोव्यातच फ्लॅटमध्ये वास्तव्यास आहे. याप्रकरणी एका गोशाळेला माहिती देण्यात आली असून लवकरच या गाईचे बचावकार्य केले जाईल.
पशुसंवर्धन खात्यातर्फे मागेच गोमंतक गोसंवर्धन योजना अधिसूचित करण्यात आली आहे. यानुसार एका कुटुंबाला जास्तीत जास्त ५ देशी गुरे पाळण्यासाठी मदत करण्यात येईल. यानुसार प्रत्येक गुरामागे दिवसाला ८० रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे.
दरम्यान गोव्यातही रस्त्यावरील भटक्या गुरांची समस्या सर्वत्र अनुभवायला येत आहे. भटक्या गुरांमुळे रहदारीला अडथळा होणे हे नेहमीचेच. तसेच भटक्या गुरांमुळे अपघात होऊन मृत्यूचे प्रमाण देखील वाढले आहे. यावर उपाय म्हणून सरकारने आता रस्त्यावरील भटकी गुरे, जनावरे जप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत पशुसंवर्धन खात्याचे संचालक डॉ. नितीन नाईक यांनी नुकताच आदेश काढला होता.
या आदेशानुसार कामधेनु अथवा पशुपालन योजनेअंतर्गत घेतलेली गुरे सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर भटकताना सापडल्यास लाभार्थ्यांना देण्यात आलेले सर्व अनुदान सरकार वसूल करून घेणार आहे. अशा व्यक्तींना भविष्यात पशुसंवर्धन खात्याच्या कोणत्याही योजनांचा लाभ मिळणार नाही. त्यांना सरकार काळ्या यादीत टाकणार आहे. या दोन सोडून खात्याच्या इतर योजना घेतलेल्या व्यक्तींनाही हाच नियम लागू असेल. आता जखमी झालेल्या या गाईच्या मालकावर सरकार व संबंधित खाते काय कारवाई करते हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे.