अलीकडेच, पश्चिम बंगालच्या दुर्गम भागात हत्तींच्या पाच बछड्यांना पुरण्यात आल्याचे वनखात्याच्या कर्मचाऱ्यांना आढळून आले. याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता; एक अभूतपूर्व बाब समोर आली. पुढे; यासंदर्भात एक शोधनिबंध प्रसिद्ध करण्यात आला.
कोलकाता : पश्चिम बंगालच्या उत्तरेला गेल्यास सुंदर चहाच्या बागा दिसतात. येथील नवीन दूअर परिसरात घडलेल्या एका रंजक गोष्टीने वनविभागाचे अधिकारी आणि शास्त्रज्ञांचे लक्ष वेधून घेतले. त्यांना जमिनीखाली गाडलेले हत्तीचे बछडे आढळले. त्यांचे पाय थोडे वरच्या दिशेने होते. पण या मागील रहस्य काय ? याचा मागोवा जेव्हा वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी घेतला तेव्हा त्यांनाही धक्काच बसला.
शवविच्छेदन केले असता हत्तीच्या एका बछड्याचा मृत्यू श्वसनसंस्थेत अडथळा व संसर्ग आदींमुळे झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर असे पुरलेले आणखी चार बछडे सापडले. जवळपास सारखाच पॅटर्न सगळ्यांमध्ये दिसत होता. प्रत्येकाचे पाय वरच्या दिशेने होते आणि त्यांचे शरीर जमिनीत होते.
असाच प्रकार यापूर्वी; आफ्रिकन हत्तींमध्येही आढळून आळीचे सांगितले जाते. पण भारतातील ही पहिलीच घटना होती. अनेक स्थानिक तसेच परदेशी प्रसारमाध्यमांनीही यावर लेख प्रसिद्ध केले. पण प्रश्न तोच, हत्तीही त्यांच्या बाळांचे सारखे दफनविधी पार पाडतात का? प्राणी सहसा अशा भावनांपासून रहित मानले जातात. असे मानले जाते की त्यांना आपल्या माणसांसारखी आसक्ती नाही. कोणी जगले अथवा मेले याने त्यांना काही फरक पडत नाही. मात्र या संशोधनानंतर या सर्व गोष्टींना नवे आव्हान मिळाले. त्याचबरोबर काही तज्ज्ञ यावरही शंका उपस्थित करत आहेत.
एका निरीक्षणात असे आढळून आले की हत्तींचा कळप एखादे बाळ मृत पावले की त्यास २-४ दिवस आपल्या सोबत घेऊन संपूर्ण जंगलभर फिरतात. यामागील शास्त्र काय आणि हत्ती असे का करतात ? कदाचित आपले बाळ जिवंतपणी जे बघू शले नाही; ते निदान त्याच्या मृतदेहाने मृत्यूनंतर अनुभवावे अशी भाबडी भावना त्यामागे असावी, असा निष्कर्ष काही शास्त्रज्ञांनी काढला.
नवीन दूअर परिसरात एक बछडा सापडल्यानंतर वन खात्याच्या कर्मचाऱ्यांना काही दिवसांत अजून चार मृतदेह सापडले. दरम्यान या पाच मुलांचे शवविच्छेदन केले असता संसर्ग आदींमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. या सर्व गोष्टी समजून घेऊन पीएच. डी करणाऱ्या आकाशदीप आणि परवीन यांनी एक संयुक्त शोधनिबंध प्रकाशित केला . जगभरातील प्रसार माध्यमांनीही या संशोधनाला स्थान दिले. 'नॅटजिओ' या अमेरिकन मासिकानेही याबाबत एक लेख प्रसिद्ध केला आहे.
या लेखात एशियन एलिफंट स्पेशालिस्ट ग्रुपचे उपाध्यक्ष हेडी रिडल यांनी या संशोधनावर पूर्ण विश्वास व्यक्त न करता तो खोडून खोडून काढला आहे. संशोधनात दिलेले पुरावे हे हत्तींनीच दफनविधी पार पाडला आहे ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी अपुरे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पीएच. डी करणाऱ्या आकाशदीपला याबाबत विचारले असता; त्यांनी सर्व पुरावे देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, डॉ. इयान डग्लस हॅमिल्टन यांनी त्यांच्या पुस्तकात आफ्रिकन हत्तींमध्येही असे अनेक विधींची नोंद दिसल्याबद्दलही सांगितले आहे. आफ्रिकन हत्ती आपल्या मृत बछड्यांना पानांनी झाकतात. शास्त्रज्ञ याला 'वीक बरीयल' म्हणतात. दरम्यान नवीन दूअर परिसरात बागांमध्ये लहान कालव्याचे खड्डे असल्याने हत्तींनी आपल्या मुलांना मातीने झाकण्याचा प्रयत्न केला असावा असा कयास आकाशदीप यांनी काढला आहे.
याशिवाय काही बछड्यांच्या पाठीवर जमिनीवर घासले गेल्याच्या खुणाही होत्या. मृत बछड्यांना घेऊन हत्तींचा कळप अनेक मैल चालला असावा असा अंदाज यावरून लावता येऊ शकतो; असेही ते म्हणाले. दरम्यान स्थानिक लोकांना हे फार पूर्वीपासून माहीत असल्याचेही ते सांगतात. दरम्यान; प्रत्यक्षात कोणीही हत्तींना बछड्यांना चिखलात गाडताना पाहिलेले नाही. पण एका प्रकरणात मात्र रात्री उशिरा हत्तींचे चित्कारण्याचे आवाज वॉचमनला ऐकू आले. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने तेथे जाऊन पाहिले असता मृत बालक मातीत गाडलेले आढळले. याशिवाय काही अंतरावर एक हत्तीण आपल्या मृत बछड्यास घेऊन फिरताना दिसली.
अजून एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हत्तीही माणसांप्रमाणे आपल्या प्रियजनांच्या मृत्यूवर शोक करतात का? याबाबत आकाशदीपने दिलेल्या माहितीनुसार, हत्तीण तब्बल २२ महिने तिच्या गर्भात बाळ वाढवते. अशा स्थितीत हत्ती आणि तिचे मूल यांच्यातील नाते असते. दरम्यान एखाद्याचा संसर्गाने मृत्यू झाला, तर मृतदेह मातीत गाडल्याने तो संसर्ग कळपात पसरत नाही.
एकीकडे आफ्रिकेतील हत्तींमध्ये विक बरियलबद्दल खूप आधी संशोधन झाले असतांना, भारतात हा प्रकार प्रथमच समोर आला आहे. हत्ती मुख्यत्वे जंगलातच राहतात. आपल्या सोंडेने खड्डा खणणे त्यांच्यासाठी अशक्यप्राय आहे. त्यामुळे ते नदीकिनारी निर्माण झालेल्या खड्ड्यांत आपल्या मृत बछड्यांना दफन करतात. यावर अजून संशोधन होणे बाकी आहे.