नवी दिल्ली : उन्हाळा सुरू होताच देशात पाण्याचे संकट गडद होऊ लागले आहे. दक्षिण भारतातील परिस्थिती वाईट आहे. दक्षिण भारतातील राज्यांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अशातच दक्षिण भारतातील काही जलाशयांत १७ टक्क्यांहून कमी पाण्याचा साठा असल्याचा अहवाल केंद्रीय जल आयोगाने जारी केला आहे.
दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये पाणीटंचाईची स्थिती गंभीर आहे. केंद्रीय जल आयोगाने गुरुवारी भारतातील विविध क्षेत्रांतील जलाशयांच्या पाण्याच्या पातळीबाबत जारी केलेल्या बुलेटिनमध्ये असे म्हटले आहे की, आयोगाच्या देखरेखीखाली दक्षिणेतील ४२ जलाशय आहेत. या जलशयांची एकूण पाणी साठवण्याची क्षमता ५३.३३४ अब्ज घनमीटर आहे. ताज्या अहवालानुसार, या ४२ जलाशयांमध्ये सध्याचा एकूण जलसाठा ८.८६५अब्ज घनमीटर आहे, जो एकूण क्षमतेच्या केवळ १७ टक्के आहे.
हा आकडा गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील पाणी साठवण्याच्या पातळीपेक्षा आणि दहा वर्षांच्या सरासरी पेक्षा लक्षणीय कमी आहे. गेल्यावर्षी हीच पातळी २९ टक्के होती तर गेल्या १० वर्षांची सरासरी ही २३ टक्के होती. दक्षिणेकडील जलाशयांमधील पाण्याची कमी पातळी ही येथील राज्यांमध्ये भविष्यात उद्भवणाऱ्या पाण्याशी निगडीत अनेक समस्यांचे द्योतक आहे.
आसाम, ओडिशा आणि पश्चिम बंगाल सारख्या राज्यांचा समावेश असलेल्या पूर्व भागात गेल्या वर्षीच्या तसेच गेल्या १० वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत जलसाठ्यात सकारात्मक सुधारणा नोंदवली गेली आहे. आयोगाने म्हटले आहे की,पूर्व भागात एकूण २०.४३० अब्ज घनमीटर पाणी साठवण्याची क्षमता असलेल्या २३ जलाशयांमध्ये सध्या ७.८८९ अब्ज घनमीटर पाणी आहे. हे प्रमाण त्यांच्या एकूण क्षमतेच्या ३९ टक्के आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या ३४ टक्के आणि दहा वर्षांच्या सरासरीच्या ३२ टक्क्यांच्या तुलनेत ही चांगली सुधारणा आहे.
पश्चिम प्रदेशाचा विचार करता गुजरात आणि महाराष्ट्राच्या जलाशयातील साठवलेल्या पाण्याची पातळी ११.७७१ अब्ज घनमीटर आहे . हे प्रमाण तेथील ४९ जलाशयांच्या एकूण क्षमतेच्या ३१.७ टक्के आहे. गेल्या वर्षीच्या पाण्याच्या पातळीपेक्षा आणि दहा वर्षांच्या सरासरीपेक्षा हे प्रमाण कमी आहे. गेल्या वर्षी साठवलेल्या पाण्याची पातळी ३८ टक्के तर गेल्या १० वर्षांची सरासरी ही ३२.१ टक्के आढळून आली आहे. त्याचप्रमाणे उत्तर आणि मध्य भागातही पाणीसाठ्यात लक्षणीयरीत्या घट झाली आहे.