म्हापसा : गोव्यात सुरू असलेली अपघाती मृत्यूची मालिका रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असले तरी त्याला अद्याप यश मिळालेले नाही. याच अपघाताच्या मालिकेत आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास गिरी-म्हापसा येथे भीषण अपघात घडला. येथील राष्ट्रीय महार्गावरील उड्डाण पुलावरून एक मालवाहू ट्रक थेट खालच्या रस्त्यावर उलटल्याने एक कामगार ठार झाला. तर, अन्य एकजण जखमी झाला आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरू आहे.
राज्यात अपघातांत होणाऱ्या मृत्यूंची मालिका सुरूच असून १ जानेवारी ते १४ एप्रिल २०२४ या १०५ दिवसांत ८४९ अपघात झाले होते. त्यांतील ९२ भीषण अपघातांत ९७ जणांचा मृत्यू झाला आहे. याच भीषण अपघातांत आज (ता. २४) गिरी-म्हापसा येथील अपघाताची नोंद झाली आहे. पंचनामा करण्यासाठी पोलीस घटनास्थळी पोहोचले असून हा अपघात नेमका कसा झाला, याचा तपास करत आहेत. तसेच मृतांची ओळख पटवण्याचेही काम सुरू आहे.
हेही वाचा
राज्यात साडेतीन महिन्यांत ९२ अपघात, ९७ मृत्यू
अपघात रोखण्यासाठी लक्षावधी रुपये खर्चून रस्ता सुरक्षा सप्ताहात जागृती करणे, बेशिस्त चालकांवर दंडात्मक कारवाई करणे आदी उपाययोजना वाहतूक खात्याकडून केल्या जात आहेत. तरीदेखील दिवसेंदिवस अपघात वाढत चालल्याचे दिसत आहे. मागील १४ दिवसांत १७ जणांचा मृत्यू झाला. त्यात दुचाकीचालक आणि दुचाकीवर मागे बसल्यांची संख्या जास्त आहे. मागील वर्षी एप्रिलच्या १४ दिवसांत ८७ अपघात झाले होते. त्यांतील ५ भीषण अपघातांत ५ जणांना जीव गमवावा लागला होता. यंदा या काळात अपघाती मृत्यूंत तिपटीने वाढ झाली आहे.
(बातमी अपडेट होत आहे.)