ठेवीदारांनी परताव्याच्या गतीवर व्यक्त केली नाराजी
म्हापसा : म्हापसा अर्बनच्या ठेवीदारांच्या ठेवी २०१५ पासून गुन्हेगारी पद्धतीने परत करण्यास नकार देण्यात आला आहे आणि त्यांच्या स्वत: कष्टाने कमावलेल्या निधीपासून त्यांना वंचित ठेवले गेल्याचा दावा ठेवीदारांनी केला आहे. ठेवींच्या परताव्याच्या गतीवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
म्हापसा अर्बन बँकेच्या ठेवीदारांनी सांगितले की, आता आठ वर्षांपेक्षा जास्त काळ उलटला आहे. आरबीआयच्या आदेशानुसार म्हापसा अर्बन बँकेच्या संचालक मंडळाच्या कथित गंभीर, निंदनीय गैरव्यवहार आणि गैरव्यवस्थापनामुळे ठेवीदारांना त्यांची कोणतीही चूक नसताना शिक्षा, वेदना आणि त्रास सहन करावा लागत आहे.
ठेवीदार जोसेफ एस. कार्नेरो, प्रभाकर व्ही. साळगावकर, अरुण एम. खवंटे आणि डॉ. कुंदा केणीम यांनी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, बँकेत पुरेशा निधीपेक्षा जास्त निधी असूनही अनेक ठेवीदारांचा निधी त्यांच्या वैद्यकीय आजारांसाठी न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दि. ५ जुलै २०२२ रोजी गोवा येथील रिट याचिका क्र. २६२१/२०२१ मध्ये लिक्विडेटरला कठोरपणे फटकारले होते. अतिरिक्त प्रयत्न करा आणि कष्टाने कमावलेल्या निधीच्या परताव्याच्या अत्यंत संथ प्रक्रियेला गती द्या, कारण ही समस्यादेखील मानवी समस्या आहे, असे न्यायालयाने म्हटले होते.
ठेवीदारांनी पुढे सांगितले की, सध्याच्या लिक्विडेटरची नियुक्ती २४ एप्रिल २०२१ पासून दोन वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली होती आणि त्यांची बदली खूप लांबली आहे आणि ते त्वरित बदलण्यास पात्र आहेत. ठेवीदारांनी दावा केला की, त्यांची कामगिरी प्रतिकूल आणि पीडित ठेवीदारांच्या हिताच्या विरुद्ध असल्याचे दिसून आले आहे.
४९.८५ टक्के ठेवीदारांचे २५० कोटी मिळाले
डिपॉझिट इन्शुरन्स आणि क्रेडिट गॅरंटी को-ऑप मुंबई (डीआयसीजीसी - आरबीआय)चे एस. सतीश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, २० ऑक्टोबर २०२३ रोजी बँक ऑफ बडोदा, म्हापसामार्फत लिक्विडेटरने सादर केलेला अनिवार्य त्रैमासिक अहवाल ३० सप्टेंबर २०२३ रोजी संपलेल्या कालावधीसाठी म्हापसा अर्बनचे अॅन्थनी डिसा सांगतात की, सुमारे २५५ कोटी रुपये (५ लाख रुपये आणि त्याहून कमी) ठेवी असलेल्या एकूण ६७,३०५ ठेवीदारांपैकी फक्त ३३,५५१ जणांना त्यांच्या सुमारे २५० कोटी रुपयाच्या ठेवी मिळाल्या आहेत. १६ एप्रिल २०२० रोजी बँक परवाना रद्द केल्यापासून आणि लिक्विडेटरची नियुक्ती केल्यापासून आजपर्यंत ४९.८५ टक्के ठेवीदारांचे २५० कोटी मिळाले आहेत.
७३.१७ कोटींच्या परताव्याची अद्याप प्रक्रिया नाही
जून २०२३ पर्यंतच्या शेवटच्या तिमाहीतील ६६,९२७ ठेवीदारांच्या तुलनेत ५ लाख रुपये श्रेणीच्या खाली असलेल्या ३७८ नवीन ठेवीदारांची (०.५६ टक्के) वाढ झाली आहे. ५ लाख रुपयांपेक्षा जास्त आणि त्यावरील वर्गवारीत ७३,१७,२९,९५१.१६ कोटी रुपयांच्या ठेवी ठेवणाऱ्या ठेवीदारांच्या परताव्याची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही.