मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-२० मालिका होणार आहे. यासाठी बीसीसीआयने संघ जाहीर केला आहे. संघाचे कर्णधारपद केएल राहुलकडे सोपवण्यात आले आहे. तर ऋषभ पंतला उपकर्णधारपद देण्यात आले आहे.
दिनेश कार्तिकची अलीकडची कामगिरी पाहता त्याला टी-२० संघातही स्थान देण्यात आले आहे. कार्तिकसोबतच इतर नवीन खेळाडूंना संधी मिळाली आहे. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचीही काळजी घेण्यात आली आहे.
बीसीसीआयच्या निवड समितीने टी-२० मालिकेसाठी युवा खेळाडूंची विशेष काळजी घेतली आहे. लखनौ सुपर जायंट्सचा उत्कृष्ट गोलंदाज आवेश खान, सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई आणि हर्षल पटेल यांनाही स्थान मिळाले आहे. कार्तिकच्या पुनरागमनासाठी ही मालिका खास असेल. कार्तिकने आयपीएलमध्ये आरसीबीसाठी चमकदार कामगिरी केली आहे. याच कारणामुळे तो टीम इंडियात परतला आहे.
विशेष म्हणजे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-२० मालिका ९ जूनपासून खेळवली जाणार आहे. त्याचा पहिला सामना दिल्लीत होणार आहे. या मालिकेतील दुसरा सामना १२ जून रोजी कटक येथे होणार आहे. तिसरा सामना १४ जूनला तर चौथा सामना १७ जूनला होणार आहे. या मालिकेतील शेवटचा सामना १९ जून रोजी बंगळुरू येथे होणार आहे. या मालिकेनंतर भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध मालिका खेळणार आहे.
भारताचा टी-२० संघ :
केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (उपकर्णधार/विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, ए. पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक.