नव्या ऊर्जा मार्गासमोर संकटाचे सावट

नवी दिल्ली : दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भूकंपाने होत्याचे नव्हते केले. त्याचबरोबर त्याचे धक्के १४ हजार किलोमीटर दूर भारतातही जाणवण्याची स्थिती निर्माण झाली आहे. (Earthquakes Hit Venezuela, But Tremors Could Be Felt 14,000 km Away In India) शक्तिशाली दुहेरी भूकंपामुळे केवळ तेथील जनजीवन विस्कळीत झाले नसून भारताच्या वाढत्या तेल आयातीवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञांच्या मते, बंदरे, वाहतूक व्यवस्था आणि तेल निर्यात पायाभूत सुविधांवर झालेल्या परिणामामुळे भारताकडे येणाऱ्या कच्च्या तेलाच्या पुरवठ्याला विलंब होण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
२४ जून रोजी व्हेनेझुएलामध्ये अवघ्या काही सेकंदांच्या अंतराने रिश्टर स्केलवर ७.२ आणि ७.५ तीव्रतेचे दोन शक्तिशाली भूकंप झाले. गेल्या १२५ वर्षांतील हे देशातील सर्वात मोठे भूकंप मानले जात असून या दुर्घटनेत शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर हजारो जण जखमी झाले आहेत. अद्यापही आफ्टरशॉक्स सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
मध्यपूर्वेतील तणाव आणि इराणमधील संघर्षामुळे तेलपुरवठ्याच्या पर्यायी स्रोतांचा शोध घेत असताना भारताने अलीकडच्या काही महिन्यांत व्हेनेझुएलाकडून कच्च्या तेलाची आयात मोठ्या प्रमाणात वाढवली होती. एप्रिल आणि मे महिन्यात भारताच्या व्हेनेझुएलातून होणाऱ्या तेल आयातीत लक्षणीय वाढ झाली होती.
तेल निर्यात टर्मिनल्सच्या कामकाजावर परिणाम
तथापि, या भूकंपामुळे तेल निर्यात टर्मिनल्स आणि बंदरांच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वीजपुरवठा खंडित होणे, वाहतूक मार्गांचे नुकसान आणि आपत्कालीन निर्बंध यामुळे मालवाहतूक काही दिवस किंवा आठवडेही उशिरा होऊ शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
महत्त्वाचे कार्गो बंदर आपत्तीजन्य स्थितीत
व्हेनेझुएलाचे महत्त्वाचे कार्गो बंदर ला ग्वायरा येथे आपत्तीजन्य स्थिती जाहीर करण्यात आल्याने जहाजांच्या हालचाली आणि माल चढ-उतार प्रक्रियेत अडथळे निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. यामुळे टँकर कंपन्यांना अतिरिक्त प्रतीक्षा कालावधी, मार्ग बदल आणि वाढीव खर्चाचा सामना करावा लागू शकतो.
आता नैसर्गिक आपत्तीचा धोका
विमा क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, आतापर्यंत व्हेनेझुएलातून होणाऱ्या समुद्री वाहतुकीचा धोका प्रामुख्याने राजकीय आणि निर्बंधांच्या दृष्टीने पाहिला जात होता. मात्र, या भूकंपानंतर नैसर्गिक आपत्तीचा धोका देखील महत्त्वाचा घटक ठरणार आहे.
ओएनजीसीची व्हेनेझुएलात गुंतवणूक
भारताची सरकारी कंपनी ओएनजीसी विदेशचीही व्हेनेझुएलातील तेल प्रकल्पांमध्ये गुंतवणूक आहे. त्यामुळे दीर्घकाळ उत्पादन किंवा निर्यात प्रभावित झाल्यास त्याचे आर्थिक आणि व्यावसायिक परिणाम भारतालाही भोगावे लागू शकतात.
भूकंपानंतर भारताच्या योजनांवर तात्पुरता परिणाम
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष डेल्सी रोड्रिग्ज यांच्यासोबत चर्चा करून खाण, औषधनिर्मिती, महत्त्वपूर्ण खनिजे आणि वाहन उद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीच्या संधींचा आढावा घेतला होता. मात्र, भूकंपानंतर या योजनांवरही तात्पुरता परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नव्या पुरवठा मार्गांवर धोके
ऊर्जा सुरक्षेसाठी पर्यायी स्रोतांचा शोध घेणाऱ्या भारतासाठी व्हेनेझुएला हा महत्त्वाचा भागीदार बनत असताना, या भूकंपाने नव्या पुरवठा मार्गांमध्येही वेगवेगळ्या प्रकारचे धोके दडलेले असल्याचे पुन्हा अधोरेखित केले आहे.