आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून जन्मदात्या बापानेच संपवले लेकीचे आयुष्य

कल्याणमध्ये ऑनर किलिंगचा थरार!

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
just now
आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून जन्मदात्या बापानेच संपवले लेकीचे आयुष्य

कल्याण : जात, धर्म आणि खोट्या सामाजिक प्रतिष्ठेची नशा जेव्हा माणसाच्या डोक्यात भिनते, तेव्हा रक्ताचे नातेही कसे क्रूर बनते, याचा एक अत्यंत थरारक आणि मन सुन्न करणारा प्रकार मुंबईनजीकच्या कल्याणमध्ये समोर आला आहे. आपल्या कुटुंबाचा विरोध झुगारून दुसऱ्या जातीतील तरुणाशी प्रेमविवाह करणाऱ्या एका २२ वर्षीय दुर्दैवी तरुणीची तिच्याच जन्मदात्या बापाने धारदार शस्त्राने निर्घृण हत्या केली. एखाद्या सस्पेन्स क्राईम थ्रिलर सिनेमाच्या पटकथेलाही मागे टाकेल अशी ही ऑनर किलिंगची घटना कल्याण पश्चिमेकडील पारेकरवाडी येथील 'रचना रॉयल' इमारतीत घडली आहे. हत्येनंतर अत्यंत चालाखीने फरार झालेल्या मारेकरी बापाला पोलिसांनी अवघ्या काही तासांत तांत्रिक तपासाच्या आधारे बेड्या ठोकल्या असून, या अटकेनंतर समोर आलेले हत्येचे कारण ऐकून पोलीस प्रशासनही चक्रावून गेले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या धक्कादायक माहितीनुसार, विनोद वसईकर असे अटक करण्यात आलेल्या बापाचे नाव असून, गायत्री वसईकर असे मयत मुलीचे नाव आहे. गायत्री ही परजातीच्या तरुणाच्या प्रेमात पडली होती. वसईकर कुटुंबाचा या आंतरजातीय संबंधांना तीव्र विरोध होता. घरच्यांनी गायत्रीचे लग्न लावून देण्यासाठी अनेक चांगली स्थळे आणली होती, अगदी दोन वेळा तर तिचे लग्न जमवून साखरपुड्याची संपूर्ण तयारीही करण्यात आली होती. मात्र, आपल्या प्रेमावर ठाम असलेल्या गायत्रीने ऐनवेळी या लग्नांना नकार दिला. अखेर कुटुंबाचा विरोध आणि सामाजिक दबावाची पर्वा न करता तिने आपल्या प्रियकराशी कोर्टात विवाह केला. लग्न करून ती आपल्या पतीसोबत सुखाने संसार करत होती, मात्र तिने घेतलेल्या या निर्णयाचा सूड घेण्याची आग विनोद वसईकर याच्या मनात धुमसत होती.

काही दिवसांपूर्वी काही वैयक्तिक कामाच्या निमित्ताने गायत्री आपल्या माहेरी म्हणजेच पारेकरवाडीतील घरी आली होती. हत्येच्या दिवशी दुपारी जेवण आटोपल्यानंतर वडील आणि मुलगी यांच्यात पुन्हा एकदा प्रेमविवाहाच्या मुद्द्यावरून कडाक्याचे भांडण सुरू झाले. हा वाद इतका विकोपाला गेला की संतापाने आंधळ्या झालेल्या विनोदने घरातील धारदार शस्त्र काढून गायत्रीवर सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेली गायत्री रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळली आणि काही वेळातच तिचा जागीच मृत्यू झाला. लेक गतप्राण झाल्याचे पाहताच विनोदने घरातून पळ काढला.

घटनेची माहिती मिळताच कल्याण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलिसांनी अत्यंत वेगाने तपासाची चक्रे फिरवत तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन आणि गुप्त माहितीच्या आधारे फरार विनोद वसईकर याला ताब्यात घेतले. पोलिसांनी जेव्हा त्याची कसून चौकशी केली, तेव्हा त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. मुलीने कुटुंबाची अब्रू वेशीवर टांगून आंतरजातीय विवाह केला, हाच राग सहन न झाल्याने तिला संपवल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून, न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीची अधिक चौकशी सुरू आहे. या घटनेने परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.



हेही वाचा