पालिकांच्या प्रभाग फेररचनेची आधीची प्रक्रिया कालबाह्य

पणजी : सरकारने नगरपालिका कायद्यात दुरुस्ती करणारा अध्यादेश जारी केल्यामुळे कार्यकाळ संपलेल्या राज्यातील ११ नगरपालिकांच्या प्रभाग फेररचनेची आधीची प्रक्रिया कालबाह्य ठरली आहे. त्यामुळे प्रभाग फेररचनेची ही प्रक्रिया रद्द झाल्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने ११ नगरपालिकांच्या निवडणुका मे महिन्यात होणे अपेक्षित होते. मात्र, आरक्षण आणि प्रभाग फेररचनेसाठी आवश्यक वेळ उपलब्ध व्हावा म्हणून सरकारने नगरपालिका निवडणुका पुढे ढकलल्या. राज्य निवडणूक आयोगाने मे महिन्यात निवडणुका घेण्यासाठी तयारी सुरू केली होती. त्यानुसार प्रभाग फेररचनेची प्रक्रिया पूर्ण होऊन प्रभागांची संख्या देखील निश्चित करण्यात आली होती.
दरम्यान, प्रभाग फेररचना आणि आरक्षणाचे अधिकार राज्य निवडणूक आयोगाकडे देण्यासंबंधीचा मसुदा जारी करून आरक्षण निश्चित करण्यासाठी नव्याने कालमर्यादा निश्चित करणारा अध्यादेश सरकारने लागू केला. त्यामुळे प्रभाग आरक्षण आणि फेररचनेची प्रक्रिया आयोगाला आता नव्याने सुरू करावी लागणार आहे.
यापूर्वी प्रभाग फेररचना मतदारसंख्येच्या आधारे होत होती, मात्र आता ती लोकसंख्येच्या आधारे केली जाणार आहे. या बदलामुळे नव्या प्रक्रियेनुसार प्रभाग निश्चिती आणि आरक्षणाचे काम पुन्हा सुरू करावे लागणार आहे.
कार्यकाळ संपलेल्या पेडणे, वाळपई, डिचोली, म्हापसा, मुरगाव, मडगाव, कुंकळ्ळी, केपे, काणकोण, कुडचडे-काकोडा आणि सांगे नगरपालिकांच्या निवडणुका नव्या प्रक्रियेनुसार होणार आहेत.