पर्यावरणप्रेमी संतापले. कासव संवर्धनावर संक्रांत.

पणजी : गोव्यातील (Goa) आश्वे आणि मोरजी समुद्रकिनाऱ्यांवर (Ashwem, Morjim Beaches) सांडपाणी उघड्यावर सोडले जात आहे. या सांडपाण्यामुळे समुद्रातील (Sea) पाणी दूषित होत असून त्याचा थेट परिणाम समुद्री जैवविविधतेवर होत आहे. प्रदूषीत सांडपाणी, ध्वनीप्रदूषण, विद्युत रोषणाई मुळे कासवे समुद्रकिनाऱ्यांवर अंडी घालण्यासाठी येणे टाळत आहेत. हे चित्र पर्यावरण (Environment) संतुलनासाठी चिंताजनक असल्याचे मत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केले आहे.
यासंदर्भात सांडपाणी उघड्यावर टाकले जात असल्याच्या ठिकाणी एकत्र येऊन पर्यावरणप्रेमींच्या एका गटाने आवाज उठवला. कासवांच्या नैसर्गिक अधिवासावर याचा विपरीत परिणाम जाणवत आहे. वाढते ध्वनीप्रदूषण, मानवी अडथळे आणि पर्यावरणातील बदल यांमुळे कासवे या किनाऱ्यांवर अंडी घालण्यासाठी येणे टाळत असल्याचे त्यांनी सांगितले.
पर्यावरण संवर्धनासाठी तातडीने योग्य उपाययोजना करणे, सांडपाणी व्यवस्थापन सुधारणे आणि या समुद्रकिनाऱ्यांवरील ध्वनी व मानवी हस्तक्षेप नियंत्रित करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. अन्यथा, येथील नैसर्गिक वारशाला आणि भविष्यातील जैवविविधतेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो; असा इशारा त्यांनी दिला.
मोरजी, आश्वे समुद्रकिनाऱ्यांवर हॉटेल रिसॉर्ट, व्यावसायिकांकडून सांडपाणी उघड्यावर सोडले जात असल्याचा दावा पर्यावरण प्रेमींनी केला. या परिसराची पाहणी केल्यानंतर वरील माहिती दिली. त्यात आलेक्स नोरोन्हा, अॅनिका प्रोएक्निका, अल्बर्ट फर्नांडिस, डेन्झिल सिक्वेरा, आरोन फर्नांडिस, मारियान बोर्गो (फ्रांस नागरिक) इत्यादींचा समावेश होता.