
पणजी : सरकार (Government) गोवा विधानसभेत (Goa Assembly) ‘वंदे मातरम्’वर चर्चा करते. मग गोव्याला (Goa) भेडसावत असलेले म्हादई व इतर प्रश्नांवर चर्चा का करीत नाही, असा प्रश्न विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी उपस्थित केला.
गोवा विधानसभा अधिवेशनात आज दुसऱ्या दिवशी सरकारतर्फे ‘वंदे मातरम्’ (Vande Mataram) गीतावर चर्चा करण्यात येत आहे. गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याने ही चर्चा आयोजित करण्यात आली आहे. त्यावर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी वरील प्रश्न उपस्थित केला.
‘वंदे मातरम्’ गीताचा मी ही आदर करतो. सरकार अनेक ज्वलंत प्रश्न असताना ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याने विधानसभेत चर्चा करते. बर्च अग्नितांडव प्रकरण, ‘कॅश फॉर जॉब स्कॅम’, राज्यातील भ्रष्टाचार, जमिनीचे रुपांतरण, खालावलेले पर्यटन असे अनेक प्रश्न आहेत. ‘वंदे मातरम्’ म्हणजे मी माझ्या आईपुढे नतमस्तक होतो. मुख्यमंत्री म्हणतात की, म्हादई ही माझी आई आहे. मात्र, गेली कित्येक वर्षे म्हादईकडे दुर्लक्ष होत आहे. म्हादई प्रश्नावर चर्चा घेण्यास ते का अपयशी ठरले, असा प्रश्न युरी आलेमाव यांनी उपस्थित केला.