
पणजी : विकसित भारत २०४७ करतानाच २०३७ पर्यंत विकसित गोवा करण्यास सहकार्य करावे; असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr.Pramod Sawant) यांनी केले.
ते गोवा मुक्तीदिनाच्या (Goa Liberation Day) शासकीय कार्यक्रमात बोलत होते. गोव्याची श्रीमंत संस्कृती साभांळण्याबरोबरच गोवा स्वच्छ, सुंदर ठेवण्यासाठी प्रत्येक गोमंतकीयांनी जबाबदारीने वागावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. गोवा राज्याचा ६४ वा मुक्ती दिन साजरा करताना शैक्षणिक, साधनसुविधा या पातळीवर मोठी कामगिरी केली आहे.
राज्याचे दरडोई उत्पन्न इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहे. तसेच कृषी, फलोत्पादन, फुलोत्पादन, मासेमारी, दुग्ध उत्पादन, मनुष्यबळ प्रशिक्षण, उद्योग, आरोग्य सुविधा, पर्यटन यात गोवा पुढे आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. गुलामी तसेच परधार्जिण्या मानसिकतेला गोव्यात वाव नाही. गोव्याचे गोंयकारपण टिकवून ठेवण्यासाठी गोमंतकीयांनी एकात्मतेने रहावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
गोवा विद्यापीठाच्या मैदानावर गोवा मुक्ती दिनाचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरूवात तिरंगा झेंडा फडकावून झाली. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पोलीस, अग्नीशामक दल, होमगार्ड आणि विद्यार्थ्यांच्या परेडचे परीक्षण केले.