उत्पल पर्रीकर यांची टीका : भाटलेतील रस्त्याचे डांबरीकरण गरजेचे!

पणजी : पणजी आणि ताळगावच्या आमदारांच्या घरासमोरील रस्त्याची दुर्दशा पाहता, आपल्याला कळून चुकेल की, आपल्या घरासमोरील रस्ता दुरुस्त करण्याची इच्छा नसलेल्यांकडून लोकांसाठी चांगले रस्ते देण्याची अपेक्षा अशी ठेवावी, अशी टीका उत्पल पर्रीकर (Utpal Manohar Parrikar) यांनी केली आहे.
इफ्फीच्या (iffi) उद्घाटनासाठी पणजी शहरातील रस्ते बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे मिरामार, करंजाळे भागात जाण्यासाठी वाहनांना भाटलेमार्गे वळविण्यात येणार आहेत. भाटले भागात गेली दीड वर्षे स्मार्ट सिटीच्या नावाखाली जागोजागी खोदलेल्या रस्त्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागणार आहे. या ठिकाणी डांबरीकरण करावे, अशी विनंती सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री कामत (Digambar Kamat) यांना करणार आहे, असे उत्पल पर्रीकर यांनी सांगितले.
भाटलेतील रस्त्यावर डांबर घातले होते, तेसुद्धा वाहून गेले आहे. आता या ठिकाणी हलक्या दर्जाचे पेव्हर्स बसवण्यात आले आहेत. ते पेव्हर्स काढून डांबरीकरण करून रस्ता दुरुस्त करण्याची गरज आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली पणजीत ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवले आहेत. रस्त्यांच्या दुर्दशेची जबाबदारी पणजीच्या आमदाराने घ्यायला हवी, मात्र ते जबाबदारी घेत नसल्याने मला या विषयावर बोलावे लागते, असे पर्रीकर यांनी सांगितले.