‘शंखनाद महोत्सव’मुळे आध्यात्मिक पर्यटनाला गती!

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत : सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाला प्रारंभ

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
18th May, 12:11 am
‘शंखनाद महोत्सव’मुळे आध्यात्मिक पर्यटनाला गती!

सनातन संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत बाळाजी आठवले यांना सन्मानित करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. सोबत इतर मान्यवर

फोंडा :
पूर्वी गोव्यात लोक समुद्र तसेच अन्य गोष्टी पहाण्यासाठी येत होते. सनातन संस्थेचे कार्य चालू झाल्यानंतर भारतीय संस्कृती आणि मंदिरे पहाण्यासाठी लोक गोव्यात येतात. गोवा भोगभूमी नसून देवभूमी आहे. सनातन संस्कृती आणि शंखनाद महोत्सवामुळे येथील अर्थकारण आणि आध्यात्मिक पर्यटन वाढेल. सनातन संस्थेचे कार्य समाजासाठी दीपस्तंभाप्रमाणे आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.
सनातन संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा ८३वा जन्मोत्सव आणि संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’चे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा शासनाच्या वतीने डॉ. जयंत आठवले यांना शाल-श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन विशेष सन्मान केला, तर देशाच्या संरक्षण कार्यासाठी डॉ. जयंत आठवले यांच्या हस्ते मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे साहाय्यता निधी सुपूर्द करण्यात आला.
या महोत्सवासाठी २३ देशांतील १९ हजारांहून अधिक भाविक उपस्थित आहेत. या प्रसंगी कुंडई येथील दत्त पद्मनाभ पीठाचे ब्रह्मेशानंद स्वामी, देवकीनंदन ठाकूर, केंद्रीय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक, म्हैसूरचे खासदार यदुवीर कृष्ण दत्त चामराज वाडीयार, पत्रकार सुरेश चव्हाणके, सनातनचे प्रवक्ते चेतन राजहंस आणि अभय वर्तक उपस्थित होते.
केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, देवकीनंदन ठाकूर, चेतन राजहंस खासदार यदुवीर कृष्ण दत्त चामराज वाडीयार, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, दामू नाईक आदींनी मनोगत व्यक्त केले.
महोत्सवाच्या प्रारंभी धर्मसंस्थापनेसाठी १ कोटी ‘श्रीराम जय राम जय जय राम’ या नामजपास प्रारंभ करण्यात आला.

आम्हाला शांतता हवी आहे!
ब्रह्मेशानंद स्वामी म्हणाले, गोव्याची समाजात जी मलिन प्रतिमा होती, ती दूर होऊन एक सात्त्विक परशुराम भूमी म्हणून गोव्याची ओळख सनातन संस्थेच्या कार्यामुळे निर्माण झाली आहे. आम्हाला शांतता हवी आहे. सनातन धर्म टिकल्यानंतरच जगात विश्वास आणि शांतता निर्माण होईल. सर्व समाजाने सनातनच्या राष्ट्र आणि धर्म कार्यात सहभागी होण्याची आवश्यकता आहे.             

हेही वाचा