हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चनांनी एकोपा टिकवून ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
पणजी : गोव्यात वक्फ बोर्ड किंवा अशा बोर्डाची कोणतीही मालमत्ता नाही. त्यामुळे संसदेत मंजूर झालेल्या वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाचा गोव्यावर कोणताही परिणाम होणार नाही. राज्यातील हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन आणि इतर सर्वच धर्मियांनी गुण्यागोविंदाने राहावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
पर्वरी येथील मंत्रालयात शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. वक्फ बोर्डाकडून गेल्या काही वर्षांपासून देशभरातील अनेक ठिकाणच्या मालमत्तांवर दावा करण्यात येत आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने यासंदर्भातील कायद्यात दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला. इतिहासात प्रथमच वक्फ बोर्डावर महिलांची नेमणूक करण्याचा निर्णय घेऊन केंद्र सरकारने महिलांना न्याय मिळवून दिला आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या या निर्णयाचे आपण स्वागत करीत आहे. केंद्र सरकारने हा निर्णय कोणत्याही धर्माविरुद्ध नाही, तर देशहितासाठी घेतला आहे. त्यामुळे गोव्यातील मुस्लिम बांधवांनीही या विधेयकाचे स्वागत करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
दरम्यान, गोव्यात वक्फ बोर्ड नाही. किंबहूना अशा बोर्डाची कोणती मालमत्ताही नाही. त्यामुळे संसदेत मंजूर झालेल्या याबाबतच्या विधेयकाचा गोव्यावर कोणताही परिणाम होणार नाही. राज्यात हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन धर्माचे लोक आतापर्यंत गुण्यागोविंदाने नांदत आहेत. हा एकोपा पुढील काळातही अशाच पद्धतीने कायम राहणे महत्त्वाचे आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी नमूद केले.