नियम दुरूस्ती मसुद्याविरोधात शिक्षण संचालकांना निवेदन सादर
पणजी : राष्ट्रीय शिक्षण धाेरणाच्या कार्यवाहीसाठी एप्रिलमध्ये वर्ग सुरू करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. एनईपीनुसार आवश्यक ते शिकवणीचे तास पूर्ण होण्यासाठी एप्रिलमध्ये वर्ग घेण्याची कोणतीही आवश्यकता नाही, असा दावा करत पालकांनी एप्रिलपासून वर्ग सुरू करण्यास विरोध केला आहे. शिक्षण नियम दुरूस्ती मसुद्याला विरोध करणारे निवेदन पालकांनी शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांना सादर केले.
सेसील रॉड्रिग्ज, सेबी मास्करान्हेस, टोनी कार्दोज, पालक शिक्षक संघाच्या सदस्यांनी शिक्षण संचालकांना निवेदन सादर केले.
विद्यार्थ्यांचा विचार न करता व पालकांना विश्वासात न घेता एनईपीच्या कार्यवाहीची प्रकिया सुरू आहे. एप्रिलपासून वर्ग सुरू करण्यासाठी नियम दुरूस्तीचा मसुदा गडबडीत जारी करण्यात आला. यामुळे या मसुद्यात ही चूक राहिलेली आहे.
तसेच सूचनांसाठी केवळ पाच दिवसांचा वेळ देण्यात आला. पाच दिवसांपैकी तीन दिवस सुट्टी होती. तरीही मसुद्याला विरोध करताना पालकांतर्फे हरकती सादर करण्यात आल्या आहेत, असे सेसील रॉड्रिग्ज यानी सांगितले.
वेगवेगळ्या इयत्तेत ज्या पालकांची मुले शिकतात, त्या पालकांची बरीच गैरसोय होणार आहे. २०२४ - २५ वर्षात नववीचे वर्ग जूनमध्येच सुरू झाले. तरीही शिक्षणाचे तास पूर्ण झाले. तसेच यापूर्वी वाढत्या तापमानामुळे दहावी व बारावीची अंतिम परीक्षा शालान्त मंडळाने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. एप्रिलपासून वर्ग सुरू करण्यास शिक्षक तसेच मुख्याध्यापकांचाही विरोध आहे. एनईपीचे निर्णय घाईत घेतले जात आहेत, असे सेबी मास्करान्हस यांनी सांगितले.
सध्याच उष्णतेचे प्रमाण पाहिले तर एप्रिलमध्ये काय परिस्थिती असेल, त्याचा अंदाज करता येतो. बऱ्याच विद्यालयामध्ये पाण्याचा तुटवडा असतो. पंख्यांचीही सुविधा नाही, असलेच तर बऱ्याच वेळा ते चालत नाही, अशी स्थिती असते. त्यामुळे या सगळ्याचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होणार असल्याची भीती सांगे येथील टोनी कार्दोज यानी व्यक्त केली.
जूनमध्ये वर्ग सुरू केल्यास होतात १२६५ तास
राष्ट्रीय शिक्षण धोरणाप्रमाणे वर्षाला शिकविण्याचे १२०० तास पूर्ण होणे आवश्यक आहे. जूनमध्ये वर्ग सुरू झाले तरी २२० दिवस मिळतात. दिवसाला पावणेसहा तास (५ तास, ४५ मिनिटे) विद्यालय चालले तरी १२६५ तास शिकविण्यास मिळतात, असा दावा पालकांनी निवेदनात केला आहे.